शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला   

ऐसपैस शिक्षण, संदीप वाकचौरे 

कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करत सरकारला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसंदर्भाने प्रश्न विचारले आहेत. न्यायालयाने या प्रश्नांची दखल घेतल्याने या प्रश्नांचे गांभीर्य सहजपणे समाजाच्या लक्षात यायला हवे. मुळात आपल्याकडे शिक्षणाच्या ताणतणावामुळे आत्महत्या होत आहेत हे खरेच; मात्र तरी त्याला केवळ शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे असे नाही. त्यापलिकडे कुटुंब व्यवस्था, घरातील नात्याची वीण, हरवलेला संवाद, मार्कांचा करावा लागणारा पाठलाग, पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा, अभ्यासाचे असणारे ओझे, शिक्षणाचा अर्थ शिकण्यापेक्षा प्रतिष्ठेचा विषय ठरू लागला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे.
 
आज दुर्दैवाने घराघरात असणारा संवाद हरवला आहे. त्याचवेळी पालक व पाल्यांचा देखील संवाद हरवला आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या हाती समाजमाध्यमे आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जग आभासी व्यवस्थेशी जोडले जाऊ लागले आहे. आंतरजालामुळे भ्रमणध्वनी हाती असल्याने आभासी विश्वासी संवाद उंचावला आहे आणि प्रत्यक्ष माणसांशी असणारा संवाद हरवला आहे. पालकांना पाल्याच्या शिक्षणाची चिंता अधिक आहे. त्यांना शिक्षण म्हणजे केवळ शाळा, शिकवणी आणि अभ्यास इतकेच वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाचा विचार पूर्णतः हरवला आहे. आपल्या पाल्याचा अभ्यासाचा थोडाही वेळ वाया जाऊ नये म्हणून पालक अधिक चिंता करतात. ही चिंता लक्षात घेऊन संवादापासून दूर जाणे घडते आहे. पाल्य दहावी, बारावीला असेल तर पालक अधिक चिंताग्रस्त असतात. त्या चिंतेतून पालकच पाल्यांची काळजी घेतात; पण ती काळजी म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर ठरू लागले आहे. मुळात जी काळजी घेतली जाते आहे ती केवळ मार्क वाढावेत म्हणूनच. विद्यार्थी जगण्यापासून, जीवन आनंदापासून तुटत आहेत. मुळात घराघरातील संवाद तुटत चालला आहे. 
 
भविष्याचा विचार करता जीवन कौशल्यांची मांडणी जगभरात होऊ लागली आहे. त्या कौशल्यांच्या सूचीमध्ये संवाद कौशल्य हे एक महत्त्वाचे कौशल्य म्हणून स्वीकारण्यात आले आहे. मुळात घरोघरी ज्याप्रमाणे संवाद कौशल्याचा अभाव निर्माण झाला आहे. त्याप्रमाणे शाळांमध्ये देखील संवाद हरवत चालला आहे. शाळांना शिक्षणाची गुणवत्ता टिकवायची आहे. अर्थात गुणवत्ता म्हणजे केवळ मार्कांची सूज असाच विचार पुढे आला आहे. वर्तमानातील जाहिरातीच्या युगात त्यांना मार्कांचा उंचावलेला आलेख दाखवायचा आहे. विद्यार्थ्यांची समग्र प्रगती किती केली? यापेक्षा मार्क किती मिळाले? हे विचारले जात असेल, तर शिक्षक आणि शाळा त्याच दिशेने प्रयत्न करणार यात शंका नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न, प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद हरवत चालला आहे.
 
विद्यार्थ्यांच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणून संवाद कौशल्याबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. आज हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला नाही, तर उद्याचे भविष्य अधिक काळोखमय होण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्याचे व्यक्तीच्या जीवन प्रवासात सर्वच ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाबरोबर व्यक्तीच्या जीवनातील संवाद योग्य दिशेने होतो आहे का? अर्थपूर्ण होतो आहे का? हे पाहणे देखील गरजेचे आहे. 
 
शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकविण्याची प्रक्रिया केंद्रस्थानी असतेच. मुळात शिक्षक जेव्हा शिकवत असतात, तेव्हाच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवादाची प्रक्रिया अपेक्षित असते. मुळात शाळेत येताना विद्यार्थी वेगवेगळ्या घरातून, कुटुंबातून, विविध परिस्थितीतून बालके सहभागी होत असतात. अशा परिस्थितीत शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागत असतो. खरेतर अशा विविध परिस्थितीशी नाते सांगणार्‍या बालकांसोबत एकाचवेळी संवाद साधायचा म्हणजे अत्यंत कठीण काम आहे. एकाच समान पातळीवर सर्व असतील, तरच संवाद आणि अर्थपूर्ण होण्याची शक्यता असते. संवादात अनेक अडथळे आहेत. संवाद जर योग्य झाला नाही, तर शिक्षणाची अपेक्षित उद्दिष्टे साध्य होण्याची शक्यता नाही. मुळात शिक्षण म्हणजे एकेरी प्रक्रिया नाही, तर ती दुहेरी प्रक्रिया आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत सातत्याने सांगितले जाते की, शिक्षणात आंतरप्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. शिक्षणात सुयोग्य स्वरूपात आंतरक्रिया होणार नसेल, तर ती प्रक्रिया ही निरर्थक होण्याची शक्यता अधिक. आंतरक्रियेशिवाय होणारे शिक्षण म्हणजे केवळ एका प्रकारचे यांत्रिक शिक्षण होण्याचा धोका आहे. वर्तमानात संवाद होतो आहे का? असा प्रश्न विचारला गेला, तर त्याचे उत्तर नाही असेच येते. आज शिक्षक हा वक्त्याच्या भूमिकेत तर विद्यार्थी हे श्रोत्याच्या भूमिकेत आहे. सर्वत्र असेच चित्र आहे. याचे कारण शिक्षणातून समग्र प्रगतीपेक्षा, आकलन, ज्ञान, उपयोजन क्षमतेपेक्षा केवळ मार्क हवे आहेत. त्यासाठी माहितीची पेरणी अधिक महत्त्वाची आहे. अशा स्वरूपाची वर्गातील आंतरक्रिया म्हणजे खरेच अध्यापन आहे का? तर त्याचे उत्तर नाही, असेच म्हणावे लागेल.
 
अनुभवातून शिकणे हवे
 
मुळात ज्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायचे आहे त्यांच्या मनात इच्छा व शिक्षणाबद्दल उत्सुकता निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यापन. ते घडावे असे वाटत असेल, तर त्यासाठी संवाद अधिक महत्त्वाचा आहे. ही संवादाची प्रक्रिया शिक्षक म्हणून पुढे घेऊन जाण्याची गरज असते. शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया ही दुहेरी असते. आपण विद्यार्थ्यांना शिकवित असतो; पण ही सारी प्रक्रिया करताना आपण पुस्तकाची माहिती, त्यातील आशय पुढे घेऊन जात असतो. त्याचवेळी विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण खूप काही शिकत असतो. मुळात शिकवताना आपण केवळ पुस्तक शिकवत असतो. शिक्षकाने देखील पुस्तकातून शिकतो असे न मानता, विद्यार्थीदेखील आपल्याला विविध स्वरूपाचे अनुभव देत असतात. त्यांच्या अनुभवातून आपले शिकणे होत असते हे सतत लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांशी असणारा संवाद हा परिणामकारक व अर्थपूर्ण होण्यासाठी सर्वप्रथम मुलांच्या वर्तनाच्या सकारात्मक बदलांची योग्य दखल घेण्याची गरज आहे. त्यांच्या वर्तनाला देखील योग्य दाद देता आली पाहिजे. विद्यार्थ्यांसोबत संवाद करीत असताना कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक भावना त्यांच्यासमोर जाता कामा नये. शिक्षक म्हणून मुलांकडून अपेक्षा असतातच; मात्र त्या त्यांना स्पष्ट सांगण्याची गरज आहे. त्यासाठी निर्मळ संवादाची गरज आहे; मात्र त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुलना करू नये. उपदेश न देता स्वतःचे अनुभव, विचार, भावना या थेटपणे मांडाव्यात. मुलांवर कुठलीही गोष्ट न लादता त्यांना पर्याय देऊन निवडीचे स्वातंत्र्य द्यावे, तसेच मूल स्वतःहून आपल्याशी बोलायला आले असल्यास ते न टाळता आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. विद्यार्थी जेव्हा बोलायला येतो, तेव्हा त्याची संवादाची भूक असते हेही लक्षात घ्यायला हवे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांनी कमी बोलणे व विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे! अशा पद्धतीचा संवाद जर मुलांसोबत झाला, तर निश्चितच आमचे अध्यापन हे आनंददायी व परिणामकारक होईल.
 
त्यामुळे शाळा, घरासारख्या ठिकाणी संवाद होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांना अधिकाधिक बोलू द्यायला हवे. विद्यार्थी जेव्हा बोलत असतात तेव्हा ते त्यांच्या मनात सुरू असणार्‍या विचाराचे दर्शन असते. त्या विचारातून विद्यार्थी अभिव्यक्त होत असतात. ते अभिव्यक्त होणे म्हणजे मनात सुरू असलेल्या विचारांची देवाणघेवाण असते. तो मार्ग आपण कधी अनुसरणार? हा प्रश्न आहे. शाळेत शिकत असताना संवादाच्या संधी अधिकाधिक कशा निर्माण होतील याकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे. त्याच बरोबर शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव यांसारख्या विषयांच्या अनुषंगाने अधिक काळजी घ्यायला हवी. या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थी अभिव्यक्त होत असतात. तेथे विद्यार्थ्यांचा एकमेकांशी होणारा संवाद अधिक महत्त्वाचा मानायला हवा. त्यादृष्टीने आपण किती प्रमाणात अशा संधी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतो त्यावर शिक्षण आनंददायी ठरण्याचा मार्ग निर्माण होऊ शकेल; मात्र अलीकडे शाळा स्तरावर असलेल्या विविध स्पर्धेच्या नावाखाली या विषयांच्या तासिका होताना दिसत नाही. हे विषय विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी अधिक महत्त्वाचे आहेत. याचे मोल लक्षात घ्यायला हवे. मैदानावर विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील आंतरक्रियेला अधिक महत्त्व आहे. मैदानावर विद्यार्थी नियमित गेला तर शारीरिक तणाव कमी होतो, त्याप्रमाणे तेथील सहकार्‍यांशी होणार्‍या संवादाने मनावरील ताणही हलका होत असतो. त्यादृष्टीने जाणीवपूर्वक त्याकडे पाहायला हवे.
 
पालकांची जबाबदारी
 
शाळेबरोबर कौटुंबिक वातावरणात देखील संवाद वाढवण्याची जबाबदारी पालकांची आहे. पालक त्यासाठी किती प्रमाणात भूमिका घेतात हे अधिक महत्त्वाचे आहे. पालकांनी दहावी, बारावीच्या वर्गात आपला पाल्य शिकत असेल, तर अधिक सुंसवादी असायला हवे. हा सुसंवाद सातत्याने जपला जाईल याकडे पाहायला हवे. किमान रात्री जेवण एकत्र करणे, गप्पा मारणे सारखे प्रकार सातत्याने घडतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. त्याच बरोबर सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग देखील वाढवण्याची जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी. विद्यार्थ्यांचा संवाद जास्तीत जास्त होईल यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न करायला हवेत. अनेकदा पालकांच्या म्हणण्यानुसार संवादासाठी वेळ देणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यासाचे मोल किती आहे हे पालक जाणून आहेत. एकएका गुणासाठी असणारी धडपड लक्षात घेऊन पालक भूमिका घेत आहेत; मात्र सातत्याने पुस्तक डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केल्याने खरेच अभ्यास होतो का? याचाही विचार करण्याची गरज आहे. तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी कितीही अभ्यास केला, तरी त्याचे फलित मात्र चांगले मिळण्याची शक्यता नाही. तणावाने मन प्रसन्न नसेल तर आकलनाची शक्ती कमी होते. एकाग्रता हरवते. त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहीलच असे नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या संवादाकडे आणि त्यासाठीच्या दिल्या जाणार्‍या वेळेकडे मानसशास्त्रीय दृष्टीने त्या प्रक्रियेकडे पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना काही काळ मित्रांशी संवाद करून देण्याची गरज आहे. अशा संवादाच्या संधी पालकांनी जाणीवपूर्वक निर्माण होतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुक्तपणे संवाद झाला म्हणजे विद्यार्थ्यांना आनंद होतो. त्यामुळे त्या संवादातून विद्यार्थ्याच्या मनावरील ताण हलका करणे आहे. पालकांनी आपल्या पाल्याला भविष्यातील निराशेपासून वाचवायचे असेल, तर त्यासाठी पाल्यांशी अधिकाधिक संवाद करण्यासाठी पावले उचलायला हवीत. विद्यार्थी शिकण्यासाठी घरापासून दूर असेल, तर त्याला काही कालखंडानंतर भेटणे, किमान रोज त्याच्याशी आभासी का होईना रोज संवाद करण्याची गरज आहे. त्याच्याशी मित्र म्हणून संवादाची वाट चालायला हवी. ही मैत्रीची वाट विद्यार्थ्यांना अधिक मोकळेपणाने संवाद करण्यासाठी प्रेरित करेल. हा संवाद जितका मोकळेपणाने घडेल, तितक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या मनातील निराशा दूर सारली जाईल. निराशा दूर जाणे म्हणजे भविष्यातील मोठ्या नकारात्मक पावलापासून त्याला दूर घेऊन जाणे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आजच छोटी छोटी पावले टाकण्याची गरज आहे. 

Related Articles