बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली   

वर्षभरात ३ कोटी ४६ लाखांच्या तक्रारी निकाली

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाद विवाद समितीने शेतकरी व व्यापार्‍यांमधील आर्थिक तक्रारी सोडवण्यासाठी आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात समितीकडे दाखल झालेल्या ३१८ तक्रारी पैकी १६५ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्यात ३ कोटी ४६ लाख ६१ हजार ४५९ रुपयांचे समाधान करण्यात आले आहे.
 
बाजार समिती प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारीत शेतकर्‍यांचे आडत्यांनी पैसे अडविल्याच्या तक्रारींची संख्या अधिक आहे. तसेच माल विक्रीनंतरचे हिशोब, बाजारभावातील फरक आदी विषयांवरच्या तक्रारींचाही त्यात समावेश आहे. बाजार समितीने या तक्रारींची सखोल चौकशी करून शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले आहेत. उर्वरित तक्रारींवरही कार्यवाही सुरू आहे. या समितीत अध्यक्ष दत्तात्रय पायगुडे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, फळे व भाजीपाला विभाग प्रमुख  प्रशांत काळभोर, संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले व नानासाहेब आबनावे यांचा समावेश आहे. या समितीच्या प्रयत्नांमुळे बाजार समितीमध्ये शिस्तबद्ध व्यवहारास चालना मिळाली आहे.
 
शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये उद्भवणारे वाद सुरुवातीला संबंधित विभागात सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तोडगा न निघाल्यास वाद विवाद समितीकडे प्रकरण पाठवले जाते. काही प्रकरणांमध्ये कायदेशीर अडचणी येत असल्या तरीही समिती तटस्थ चौकशी करून योग्य निर्णय घेते, असे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.
 
तत्काळ दखल 
 
शेतकरी जेव्हा शेतीमाल घेऊन बाजारात येतो व तक्रार करतो, तेव्हा आम्ही तत्काळ दखल घेतो. कायद्यानुसार संबंधित अडत्यावर कारवाई करून शेतकर्‍यांना तातडीने पैसे मिळतील याची खात्री देतो. अनेक वेळा कारवाईच्या आधीच अडत्यांकडून पैसे मिळवून देतो. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये हा या समितीची मुख्य उद्देश आहे. 
 
- दत्तात्रय पायगुडे, अध्यक्ष, वाद विवाद समिती, बाजार समिती पुणे.

Related Articles