पंचकुला परिसरात एकाच कुटुंबातील सात जणांनी आयुष्य संपवले   

पंचकुला : एकाच कुटुंबातील सात जणांच्या आत्महत्येने हरयाणातील पंचकुला भागात खळबळ उडाली आहे. डेहराडून येथून आलेल्या कुटुंबातील सात  सदस्यांनी पंचकुला जिल्ह्यात टोकाचे पाऊल उचलले. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची तीन मुले आणि दोन वृद्ध सदस्यांचा समावेश आहे. ही घटना पंचकुला  सेक्टर-२७ मध्ये घडली. या कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली. संबंधित कुटुंब बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या पंचकुला सेक्टर-२८ मधील प्रवचन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते, असे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक तणावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 
पोलिसांना सोमवारी रात्री ११ वाजता माहिती मिळाली की, एका गाडीमध्ये काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात ६ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर एकाची प्रकृती गंभीर होती, ज्याचा नंतर मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, तीन मुले आणि दोन वृद्ध सदस्यांचा समावेश आहे.
 
प्रवीण मित्तल यांनी काही वर्षांपूर्वी डेहराडूनमध्ये 'टूर अँड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय सुरू केला होता, ज्यात त्यांना मोठे नुकसान झाले. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे आणि वाढत्या कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
 
"संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. सर्वांची ओळख पटली आहे. पोलीस पथके या प्रकरणाच्या कारणांचा शोध घेत आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल," असे डीसीपी हिमाद्री कौशिक यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी लॉ अँड ऑर्डर अमित दहिया घटनास्थळी पोहोचले.

वीस कोटींचे कर्ज 

पंचकुलामध्ये प्रवीण मित्तल यांनी त्यांच्या कुटुंबातील ७ सदस्यांसह आत्महत्या केली. प्रवीण टॅक्सी चालक म्हणून काम करायचे. प्रवीणवर १५ ते २० कोटी रुपयांचे कर्ज होते. मित्तल कुटुंब मूळचे हिसारच्या बरवालाचे होते. गेल्या १२ वर्षांपासून मित्तल कुटुंब पंचकुलात वास्तव्यास होते. काही वर्षांपूर्वी प्रवीण यांची हिमाचल प्रदेशातील स्क्रॅप फॅक्टरी बँकेने जप्त केली. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने ही कारवाई केली. आर्थिक अडचणीत असलेले प्रवीण अचानक पंचकुला सोडून उत्तराखंडच्या देहरादूनला गेले. ते ५ वर्ष अनेकांच्या संपर्कात नव्हते.
 
कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करणाऱ्या प्रवीण यांच्या डोक्यावर २० कोटी रुपयांचे कर्ज होते. मित्तल यांचे कुटुंब मोहालीच्या खरडनंतर पंचकुलाच्या सकेतडी गावाजवळ वास्तव्यास होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणीत आलेल्या प्रवीण यांची मालमत्ता बँकेने जप्त केली. आधी त्यांचे दोन फ्लॅट ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कारखाना आणि वाहनांवर टाच आणली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. माझे अंत्यसंस्कार चुलत भाऊ संदीप अग्रवाल यांनी करावेत, अशी इच्छा प्रवीण यांनी चिठ्ठीत लिहिली आहे. संदीप आणि प्रवीण यांच्यात ५ दिवसांपूर्वीच संवाद झाला होता. प्रवीण आणि त्यांचे कुटुंब २०२० ते २०२३ या कालावधीत देहरादूनमध्ये वास्तव्यास होते. 
 

Related Articles