साहित्यिकांनी सत्तेपुढे नतमस्तक होऊ नये : डॉ. सविता सिंह   

पुणे : साहित्यिकांचे कार्य सृजनात्मक असते. एखाद्या प्रसंगाची अनुभूती साहित्यिकाला अस्वस्थ करते. दुष्कर्म विशेष दु:ख पोहोचविते. अशा प्रसंगातून फक्त कल्पनेला वाव न देता साहित्यिकांनी वास्तववाद आणि कल्पनेची सांगड घालत आजच्या काळात विचार स्पष्टपणे मांडत साहित्यकृती निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या समाजाची विचारधारा जगातील इतर विचारधारांपेक्षा स्वतंत्र आहे. कारण आपल्या समाजात विविध जात, धर्म, पंथ, भाषा यांची भिन्नता आहे. हे वैविध्य  नष्ट करणार्‍या वृत्तीस साहित्यिकृतीतून विरोध व्हावा. लेखनातील स्वायतत्ता जपताना साहित्यिकांनी सत्तेपुढे नतमस्तक होऊ नये, असे परखड मत सुप्रसिद्ध हिंदी लेखिका व विचारवंत डॉ. सविता सिंह यांनी व्यक्त केले. 
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वधार्पन दिनानिमित्त सोमवारी विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळा झाला. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
 
डॉ. सिंह म्हणाल्या, भाषा जाणतो म्हणून मनुष्य उन्नत ही धारणा चुकीची असून इतर जीवांच्याही भाषा आहेत. त्या समजून घेण्यास मनुष्य कमी पडत आहे! मनुष्याच्या उत्क्रांतवादात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. परंतु निसर्गाचे ऋण न फेडता भोगवादी संस्कृतीच्या आहारी जाऊन मनुष्य स्वत:ला उध्वस्त करत आहे. मनुष्य असहिष्णुततेच्या पराकोटीला पोहोचल्यास त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. सहिष्णु समाजाची निर्मिती करण्यासाठी साहित्यिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. 
 
प्रास्ताविकात मसापच्या वाटचालीविषयी माहिती देऊन प्रा. मिलिंद जोशी यांनी पुरस्कारांविषयी भूमिका विशद केली. परिषेदच्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले तर सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.
 
पुरस्काराला उत्तर देताना अमोल पालेकर म्हणाले, आज हिंसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सभोवतालच्या असंतोषामुळे समाज अस्थिर बनला आहे. अशा वेळी कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला विरोध करणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या माध्यमातून समाजाला जागृत करणे ही काळाची गरज आहे. 
 

Related Articles