पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करा : द्विवेदी   

पुणे : आगामी आषाढी एकादशी पालखी सोहळ्यासाीं शासकीय अधिकार्‍यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकर्‍यांसाठी आरोग्य व्यवस्था, औषधसाठा आदिंची उत्कृष्ट व्यवस्था करावी. तसेच पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकर्‍यांच्या सूचनांच सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्या.
 
विधानभवन येथे सोमवारी आयोजित आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अप्पर आयुक्त महेश पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद, कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आदि तसेच विविध पालखी सोहळ्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
यंदा पावसाचे प्रमाण पाहता पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सांगून द्विवेदी म्हणाल्या, एकत्रित नियंत्रित कक्ष समन्व याने सुरू राहिल. सर्व अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील, असे नियोजन करावे. पालखी सोहळ्याला होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेर्‍याचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. साखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने आवश्यक तेथे मनुष्यबळ पुरवावे, पार्किंगची व्यवस्था असेल याकडे लक्ष द्यावे.
 
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या दुरुस्ती बरोबरच पालखी मार्गाला जोडले जाणार्‍या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांवरील राडारोडा काढणे, मुरुमीकरण करणे आदि उपाय योजना कराव्यात.वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी टँकर भरण्यात येणार्‍या स्रोतांची तपासणी करावी ते वापरासाठी वैध कालावधीतील असल्याची खात्री करावी. पालखी मार्गावरील दुकानांतील खाद्य पदार्थांचे, पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी. यंदा मोबाइल स्वच्छतागृहाची संख्या वाढवण्यात आली आहे.
 
त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत, त्यांची नियमित स्वच्छता राहावी. यावेळी पुणे, सातारा, सोलापूर, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. सोलापूरचे जिल्हाधिकारी आर्शीवाद म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर करण्यात येणार असून, त्यासाठी काही अ‍ॅपही विकसित करण्यात येणार आहे. सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, खासगी कुटुंबानी वारकर्‍यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शवली आहे. अशा घरांवर पांढरे झेंडे लावून पालखी सोहळ्याची माहिती देण्यात येणार आहे. 
 
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १ हजार ८०० टँकर, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार २०० तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांसाठी ३ हजार पालखी मेडिसीन किट पालखी सोहळा प्रमुखांकडे देण्यात येणार आहे.

Related Articles