युद्धाचा फटका भारत आणि पाकिस्तानलाही   

वृत्तवेध 

युद्ध कोणाचेही भले करत नाही तर सर्वांचे नुकसान करते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर, जगातील प्रत्येक देश आणि अर्थकारणाचा अभ्यास करणार्‍या एजन्सीज युद्धामुळे दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगत आहेत. पाकिस्तानला तर दररोज चार अब्ज रुपये सैन्याच्या हालचालीवर खर्च करावे लागत आहेत.
 
जागतिक रेटिंग एजन्सी ‘एस अँड पी’ने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांसाठी क्रेडिट रिस्क वाढेल. ‘एस अँड पी’ने सध्या भारताला सकारात्मक दृष्टिकोनासह ‘बीबीसी’ रेटिंग दिले आहे तर पाकिस्तानला स्थिर दृष्टिकोनासह सीसीसी + रेटिंग दिले आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सार्वभौम क्रेडिट रेटिंगवर कोणताही तात्काळ परिणाम दिसत नाही. पुढील दोन ते तीन आठवडे तणाव कायम राहण्याची अपेक्षा असून दोन्ही बाजूंकडून मोठी लष्करी कारवाई केली जाऊ शकते.
 
‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने एका निवेदनात म्हटले आहे, की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने प्रादेशिक पतधोका वाढला आहे. तीव्र लष्करी कारवाई तात्पुरती असण्याची शक्यता आहे. कर्ज घेणारी व्यक्ती, संस्था किंवा सरकार वेळेवर किंवा पूर्णपणे कर्ज किंवा व्याज परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास होणारा आर्थिक धोका म्हणजे क्रेडिट रिस्क. पाकिस्तान आधीच रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करत आहे. त्यामुळे वाढती ‘क्रेडिट रिस्क’ त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक घातक ठरू शकते.
 
‘एस अँड पी’ने म्हटले आहे की, भारताची आर्थिक वाढ चांगली राहील आणि वित्तीय सुधारणा हळूहळू सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे. सरकार आपली अर्थव्यवस्था सुधारण्यावर आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यावरही लक्ष केंद्रित करेल. दोन्ही देशांमध्ये सध्याचा तणाव जास्त काळ चालू ठेवण्याचा कोणताही आधार दिसत नाही. यापूर्वी, ‘रेटिंग एजन्सी’ने अमेरिकेच्या व्यापार धोरणावरील अनिश्चिततेचे कारण देत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता
 

Related Articles