वाचक लिहितात   

दहशतवाद्यांचा सन्मान संतापजनक

पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल असे म्हटले आहे. बहावलपूरवरील हल्ल्यास जबाबदार असणार्‍या जैश ए मोहम्मद संघटनेच्या संस्थापक म्होरक्याच्या कुटुंबातील १४ जण सिंदूर ऑपरेशनमध्ये ठार झाले त्यांना प्रत्येकी एक कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे, जखमी झालेल्या दहशतवाद्यांना लाखो पाकिस्तानी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. सिंदूर ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या पाकिस्तान लष्कराच्या जवानांच्या कुटुंबियांना सैनिकी पदांच्या दर्जांप्रमाणे त्यांच्या निवृत्तिकालापर्यंत वेतन आणि निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.  दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी पाक रुपयांची भरपाई आणि दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाची बांधणी करून देणार आहे त्याचा संताप प्रत्येक भारतीयांच्या मनात दीर्घकाल खदखदत राहणार आहे. दहशतवाद्यांच्या कृत्यांना नेहमीच पाठिंबा देणार्‍या आणि आर्थिक मदत करणार्‍या पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेल्या भरपाईच्या बातमीवरून पाकिस्तानच दहशतवादी संघटनांच्या आणि त्यांच्या अड्ड्यांना समर्थन देत असल्याचे स्पष्ट होते. 

स्नेहा राज, गोरेगांव.

पोहताना काळजी घ्या

शाळेला सुट्ट्या लागल्याने तसेच वाढत्या उकाड्याने हैराण झालेली शाळकरी व तरुण मुले पोहण्यासाठी नदी, विहीर, तलाव किंवा कालव्यावर जाऊन पोहण्याचा आनंद घेत आहेत. मात्र काही मुले घरातील कोणालाही न सांगता किंवा घरातील मोठ्या मंडळींचा डोळा चुकवून पोहायला जातात. काही मुले तर पोहता येत नसतानाही पोहण्याचे धाडस करतात, परिणामी काहींना आपला जीव गमावावा लागतो. पोहायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू अशा बातम्या उन्हाळ्यात हमखास वाचायला मिळतात. लहान मुलांचा असा अकाली मृत्यू  मनाला चटका लावून जातो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. मुलांनीही परस्पर पोहायला न जाता मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच जावे. 

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे 

हिंदीची सक्ती नकोच

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावाखाली महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभरातून लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून सामान्य जनतेने देखील सरकारच्या या निर्णयावर सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. शिक्षणात देशाच्या अहिंदी पट्ट्यातील महाराष्ट्र आदी राज्ये त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा ’हिंदी’ शिकवतात; पण उत्तरेतील नऊ-दहा हिंदी भाषिक राज्यांपैकी एकही राज्य कोणतीही इतर भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आधीच पाचवीपासून हिंदी भाषा शिकवली जात असताना आता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचे प्रयोजन काय हे न उलगडलेले कोडे 
आहे.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

बांधकामाचा त्रास

सध्या एरंडवणे बंगले पाडून व्यावसायिक इमारती बांधून पैसे कमावण्यासाठी चढाओढ लागली आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम व्यावसायिक इतर शहरात राहून प्लॉटचे खोदकाम इथे महिनोंमहिने चालू ठेवले आहे. या खोदकामाचा आवाज इतका प्रचंड आहे, की आजूबाजूच्या नागरिकांना त्रास तर होतोच, शिवाय तेथील इमारतींना धोक्यात आणण्याचा प्रकार आहे. प्रदूषणामुळे रहिवाशांना वैताग आणला आहे. स्मार्ट सिटीच्या हव्यासापोटी शहराची वाट लागली. पुढची पिढी आताच सावध राहून पुण्यातील नदी, टेकडी, जमिनी वाचवा, कारण निसर्गाशी छेडछाड घातक आहे हे जाणून घ्या.

नीलम सांगलीकर, पुणे.

मोबाईलमुळे नाती दुरावली

आज मोबाईल संस्कृतीचा वाढता वापर, समाज परिस्थितीमुळे दुरावत चालले सामाजिक व कौटुंबिक संबंध याचा मोठा परिणाम कौटुंबिक नातेसंबंध दुरावण्यावर होत आहे. याशिवाय एकत्र कुटुंब पध्दतीचा होत असलेला लोप. कुटुंबातील जेष्ठ ची वाढत असलेली संख्या व विभक्त होत असलेली कुटुंबे यामुळे कुटुंबातील नात्या-गोत्यांच्या व्यक्ती एकदुसर्‍या पासून दुरावत असून त्यांच्यातील संवाद प्रक्रिया ठप्प होत आहे. मुलां-मुलीत अहंमपणा वाढत आहे. त्यांच्या वयक्तिक व खाजगी जीवनात कुटुंबातील जेष्ठ सदस्याने केलेला हस्तक्षेप त्यांना सहन होत नाही. यामुळे कुटुंबातील जवळीकता, एक दुसर्‍यांबाबत असलेला आदर,मान, सन्मान, व आत्मीयता अजिबात दिसून येत नाही. हे बदलत्या सामाजिक व कौटुंबिक जीवनाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कुटुंबातील सदस्यांनी एकदुसर्‍याशी  वारंवार संवाद साधून बोलके राहणे गरजेचे आहे. सवांद व्यक्तीला केवळ सशक्तच बनवित नाही तर दोन्ही संवादानार्थी यांची मानसिक, भावनिक, वैचारिक स्थिती अधिक प्रभावशाली बनवितात. कुटुंब व समाजातील व्यक्तींनी अबोला, दुरावे, नाराजगी बाजूला ठेऊन संवाद साधन्यावर अधिक भर द्यावा.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

 

Related Articles