भारतीय ज्ञान परंपरेची जगाला भुरळ   

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन 

पुणे : जगाला भारतीय ज्ञान परंपरेची भूक निर्माण झाली असून, सर्व देशातील विद्यार्थी भारतीय ज्ञानाला प्राधान्य देत आहेत. भू-भागासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध होत असताना कुठल्याही शस्त्राचा, बळाचा वापर न करता देशाला २०४७ मध्ये जगतगुरू बनवायचे आहे. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचा समारोप चंद्रकांत पाटील यांच्या ‘भारतीय ज्ञान संपदा-विश्व कल्याणाची गंगोत्री’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. त्यावेळी पाटील बोलत होते. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, कार्यवाह डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होते. 
 
पाटील म्हणाले, मानसिक, आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि तणावमुक्त जीवन हे सध्याच्या काळात मोठे आव्हान बनले आहे. भौतिक सुखवाद आणि स्पर्धात्मक युगातील अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांची होणारी होरपळ रोखण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण करण्याची वेळ आली आहे. या ज्ञानपरंपरेची बलस्थाने ओळखून महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात प्राचीन ज्ञानपरंपरेचा समावेश करण्यात आला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. 
 
येत्या २५ वर्षांत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भारतीय ज्ञान परंपरा जगापर्यंत पोहचावयाची आहे. देशाला जगाचे लोहचुंबक व्हायचे आहे. जग आपल्या प्राचीन ज्ञानाकडे आकर्षित होत आहे. सरंक्षण क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणात संशोधन वाढविले आहे. यंदा आपण ८५ हजार कोटींचे साहित्य निर्यात केले आहे. नालंदा विद्यापीठापासून आपल्याकडे विद्यापीठाची परंपरा आहे. भारतीय ज्ञान प्रणाली हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. ही ज्ञानपरंपरा बौद्धिक विकासापुरती मर्यादीत नसून समृद्ध जीवनाच्या दृष्टीने तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतिमीमांसेची ओळख करून देणारी आहे. या वैश्विक ज्ञानामध्ये महाभारतातील राजनीती, कुटनीती, जगाला गणिताचे ज्ञान देणारे आर्यभट्ट, वैद्यकीय शास्त्रातील सुश्रूत आणि चरक, भाषा शास्त्रात पाणिनी, अर्थशास्त्रात चाणाक्य यांसारख्या प्रज्ञावंतांचे मौलिक संशोधन महत्त्वाचे आहे. योगविद्या, आयुर्वेद, नैसर्गिक चिकित्सा या प्राचीन परंपरेबरोबर गणिताच्या क्षेत्रात भारताने शून्य, दशमान पद्धती आणि बीजगणिताचा शोध लावून जगाच्या गणनापद्धतीत क्रांती केली आहे, त्यामुळे भारताचा बौद्धिक वारसा अद्यापही टिकून आहे. हे ज्ञानात्मक बीज आधुनिक युगात पुन्हा रुजविण्यासाठी केवळ माहिती देणारे शिक्षण न राबविता वैश्विक ज्ञान, जीवनमूल्यधारणांनुसार प्रेम, सहिष्णूता, अपरिग्रह, शांती आणि अंहिसेच्या मूल्यधारणांंची संपदा असा विविध ज्ञानसंपदेचा अभ्यास शाळा, विद्यापीठांमध्ये संस्कृत, योग, आयुर्वेद, दर्शनशास्त्र, उत्पत्तीशास्त्र, कोषशास्त्र, याश्कशास्त्र यांचा पाठ्यक्रमात समावेश करून शिकवला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 
 
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वसंत व्याख्यानमालेच्या वाटचालीवरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. ग्रंथाच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलणारे डॉ. सु. गो. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बिडवे बंधु यांच्या नगारा वादनाने टिळक स्मारकातील वातावरण प्रफुल्लीत झाले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी सुत्रसंचालन केले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यकारिणी सदस्य स्वप्निल पोरे यांनी आभार मानले. प्रारंभी चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली.
 
ही व्याख्यानमाला अखंड सुरू राहो...
 
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करणारी वसंत व्याख्यानमाला हा एक चमत्कार आहे. या व्याख्यानमालेची नोंद इतिहासाने सुवर्णअक्षरात घेतली आहे. लोकमान्यांनी या व्याख्यानमालेला ज्ञानव्यापी म्हटले होते. ही व्याख्यानमाला तीन शतकांची साक्षीदार आहे. विविध क्षेत्रातील अनेक बदल या व्याख्यानमालेने पाहिले आहेत. त्यामुळे हे ज्ञानयज्ञ भविष्यातही अखंड सुरू राहावे, अशी मी प्रार्थना करतो, असे सांगून वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक म्हणाले, पूर्वी व्याख्यानासाठी वक्त्याला पुस्तके वाचावी लागायची. आता आपण संगणक, मोबाईलपर्यंत येऊन पोहचलो आहोत. सर्व माहिती एका छोट्याशा चीपमध्ये सामावली आहे. यंत्रयुगात सुरू झालेली ही व्याख्यानमाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळापर्यंत येऊन पोहचली आहे. तिकीट काढून व्याख्यान ऐकण्याची परंपराही या व्याख्यानमालेने सुरू केली, असल्याचेही डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले. 

Related Articles