वाचक लिहितात   

वृत्तपत्रांवरील विश्वास कायम

देशातील नागरिकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास आजही कायम आहे, नव्हे तो वाढलाच आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाचे विश्लेषण आणि वार्तांकन न्यूज चॅनेलवर चोवीस तास चालू आहे; मात्र नागरिकांना या न्यूज चॅनेलवरील वार्तांकन आणि विश्लेषणापेक्षा वृत्तपत्रांमध्ये छापून येणार्‍या बातम्या आणि विश्लेषणावर अधिक विश्वास आहे. सतत चोवीस तास बातम्या दाखवणार्‍या दूरचित्रवाहिन्या व समाज माध्यमाच्या आजच्या युगात वृत्तपत्रे मागे पडतील असे अनेकांना वाटत होते; पण दूरचित्रवाहिन्या असोत, की समाज माध्यमे नागरिकांचा विश्वास मात्र वृत्तपत्रांवरच जास्त आहे. दूरचित्रवाहिन्यांवर सतत दाखवण्यात येणार्‍या ब्रेकिंग न्यूजपेक्षा नागरिकांना वृत्तपत्रातील पहिल्या पानावरील हेडलाइन जास्त महत्वाची आणि विश्वासार्ह वाटते. नागरिकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास आजही कायम आहे.

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

हक्क का नाकारता?

नागपुरात धार्मिक कारणाने विद्यार्थिनीला दयानंद आर्य कन्या विद्यालयात प्रवेश नाकारला! हे वृत्त वाचून वाईट वाटले. या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्याचे कारण काय, तर ती मुलगी अल्पसंख्याक अथवा मुस्लिम आहे. मग यात त्या मुलीचा अथवा तिच्या आई-वडिलांचा काय दोष? शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जात, धर्म व पंथाच्या भिंती पाडून, आपणच जर त्यांच्या शिक्षणाचा हक्क नाकारू लागलो, तर त्यांनी काय करायचे? व दाद कोणाकडे मागायची? आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत, हे विसरता कामा नये. त्यानुसार जाती, धर्म व पंथाच्या भिंती झुगारून देणे, ही काळाची गरज आहे.

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई

तारतम्याची अपेक्षा

युद्धाच्या कथा ऐकायला रंजक वाटू शकतात; पण प्रत्यक्षात त्या युद्धाचा अनुभव भोगणार्‍यांसाठी त्यात काहीही रम्य नसते. भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचे वार्तांकन करताना अनेक भारतीय वृत्तवाहिन्यांनी हेच भान गमावले. जुन्या युद्धाच्या चित्रफिती थेट प्रसारण म्हणून दाखवणे, भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसून महत्त्वाची शहरे ताब्यात घेत असल्याच्या ब्रेकिंग न्यूज... अशा खोट्याच नव्हे, तर अतिशयोक्त बातम्यांनी बातम्यांच्या नावाखाली कल्पनारंजन सुरू केले. २६/११ च्या हल्ल्यावेळी लष्करी कारवाईचे थेट प्रक्षेपण करून दहशतवाद्यांना माहिती पुरवणार्‍या चुकांची आठवणही यावेळी कुणाला झाली नाही. संरक्षण मंत्रालयाने वेळीच हस्तक्षेप करून थोडाफार आळा घातला; पण तोपर्यंत जनमानसावर खोट्या विजयाची छाया पडली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री वाहिनीवरील संयमित, तथ्याधारित आणि शांत शैलीत दिलेल्या बातम्यांनी विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण केला. ही वृत्तवाहिनी इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.

दीपक गुंडये, वरळी

ट्रम्प यांच्या कोलांटउड्या

ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई! ही केसरी (दि.१७ मे) मधील बातमी वाचून करमणूक झाली. अमेरिकेचे दुसर्‍यांदा नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीवर सर्व जगच नाराज आहे. मुळात अमेरिका ही महासत्ता गणली गेल्याने ट्र्म्प जागतिक परिस्थिती त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी कोलांट उड्या मारू शकतात हे आता कटू सत्य आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्यावरील भारताच्या हल्ल्यांमुळे विचलीत होऊन ट्रम्प यांनी परस्पर संघर्ष बंदी जाहीर करून टाकण्याचं धोरण अवलंबले. आयात शुल्कवाढीचं नाटक करून व्यापाराचे शीतयुद्ध, रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याचा आव आणणं, इराण, इराक, इस्त्रायल यांच्याबाबतीतही युद्धजन्य परिस्थितीच्या आगीत तेल ओतणे, इतर देशांच्या उत्पादनांवर बंधनं आणणे,  इत्यादि उचापती ट्रम्प यांनी थांबवण्यासाठी पावलं उचलण्या ऐवजी नोबेलसारख्या सर्वोच्च पुरस्काराची अपेक्षा करणं हास्यास्पदच आहे.

श्रीपाद कुलकर्णी, पुणे

आता भाज्याही कडाडल्या

तपमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्यामुळे एकीकडे उष्णतेच्या झळांनी संपूर्ण राज्य व्यापून गेले असतानाच दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनाला दुहेरी फटका बसला. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या किमतीही वाढल्या असून याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे. भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. घाऊक बाजारात तोंडली, दोडकी, वांगी, फ्लॉवर, कोबी या भाज्या  ४० ते ५० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. काही भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकल्या जात आहेत. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडर, एसटी बस, बेस्ट बसचे भाडे, दूध असे सर्वांचेच दर वाढले असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडत आहेत.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

Related Articles