कुटुंब संस्कारातूनच मुलांची उत्तम घडण   

भारतीय स्त्री शक्तीचा स्थापना दिन उत्साहात

पिंपरी : भारतीय स्त्री शक्तीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने  ’माझ्या तुझ्या नजरेतून स्त्री पुरुष समानता’ ह्या विषयावर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी येथे झालेल्या ह्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते कल्पना व प्रकाश क्षीरसागर आणि स्वाती व विकास देशपांडे यांना मुलाखतकार शिल्पा बिबीकर यांनी बोलते केले. त्यांच्या प्रश्नांना दोन्ही जोडप्यांनी विषयानुरूप प्रतिसाद देत मुलाखत रंगत गेली.  
 
स्त्री-पुरुष समानतेची व्याख्या करताना क्षीरसागर म्हणाले  आपली संस्कृती हि स्त्रीमुक्ती कडे न  जाता स्त्रीशक्ती कडे जाणारी आहे. स्त्री पुरुष समानता म्हणजे समान अधिकार, समान संधी, वागणूक, वेतन,  शिक्षण आणि आर्थिक अधिकार, लिंगभेद न  करता जबाबदारी आणि संधी दिली जाणे ती खरी समानता.समाज आणि पर्यायाने राष्ट्र सक्षम बनवायचे असेल तर त्याची सुरुवात कुटुंबापासूनच सुरू झाली पाहिजे.  कुटुंबसंस्था सक्षम असेल तर नक्कीच मुलांवर उत्तम संस्कार घरातूनच होतात आणि त्यामुळे सुदृढ समाज तयार व्हायला मदत होते. 
 
संस्कार, शिस्त आणि एकमेकांप्रति विश्वास हे  कुटुंबातूनच मुलांच्या अंगी रुजवले जातात. स्त्रीला तिचे करिअर घडवायचे असेल तर कुटुंबाचा खंबीर सपोर्ट हा तिच्यासाठी आवश्यक असतो तरच ती उत्तम करिअर घडवू शकते. सक्षम कुटुंब संस्था ही स्त्री पुरुष समानतेचा भक्कम पाया आहे. स्त्रियांना समाजात अजूनही दुय्यम वागणूक दिली जाते का? या प्रश्नाचे उत्तर हो असे होते. काही क्षेत्र अशी आहेत जिथे स्त्रीची सुरक्षितता आणि स्त्रीची शारीरिक क्षमता ही विचारात घेऊन काही जबाबदार्‍या ह्या पुरुषांनाच दिल्या जातात असे दिसून येते. खेड्यांमध्ये अजूनही स्त्री पुरुष समानतेचे प्रमाण विषम आहे.  
 
गवंडी काम शेतीचे काम या क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष वेतन दरही वेगवेगळे असतात.  काही संस्थांमध्ये अजूनही पुरुषांना प्राधान्य दिले जाते.  स्त्रियांना सर्व क्षेत्रात समावेशक बनवायचे असेल तर समाजाची मानसिकता, वातावरण विश्वसनीय बनवावे लागेल.  कुटुंबातून योग्य संस्कार मुलांवर झाले तर उत्तम समाज आपोआप निर्माण होईल. स्त्री-पुरुष समानता जर समाजात रुजवायची  असेल तर स्त्रियांनी सुद्धा स्त्री असण्याचा फायदा  नाही घेतला पाहिजे.  स्त्री सक्षम असेल तर आरक्षण, सवलती लाभ न घेता आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार करताना स्त्री आणि पुरुषा मध्ये सुदृढ मैत्री ही सुद्धा आवश्यक आहे.  एकमेकांवर विश्वास आणि मोकळे वातावरण असेल तर नक्कीच ही मैत्री जपता येते. 
 
मातृशक्ती, स्त्रीशक्ती ही कुटुंब पर्यायाने समाज आणि राष्ट्र यांना एकत्र बांधून ठेवते. स्त्री-पुरुष समानतेचा विचार करताना कुटुंब प्रबोधन आणि कुटुंब संस्था हे घटक खूपच महत्त्वाचे आहेत असे दोन्ही जोडप्यांचे मत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक मनाली जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन निवेदिता कच्छवा यांनी केले.

Related Articles