सुनील गावस्करांनी अय्यरचे केले कौतुक   

नवी दिल्ली : श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात एक-दोन नव्हे तर तीन संघांना प्लेऑफमध्ये पोहचवणारा पहिला कर्णधार बनला आहे. दिल्ली कॅपिटल्स, केकेआर नंतर अय्यरने त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले आहे. त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी राजस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर गावस्कर यांनी अय्यरवर स्तुतीसुमने उधळताना असे काही म्हटले की जणू ते गौतम गंभीरला लक्ष्य करत आहेत असे वाटले.
 
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये अय्यरवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. गावस्कर म्हणाले की, ‘गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवूनही, त्याचे श्रेय अय्यरला मिळाले नाही. संघाला जेतेपद जिंकण्याचे श्रेय डगआउटमध्ये बसलेल्या कोणालाही देऊ नये. पण या वर्षी अय्यरला योग्य श्रेय मिळत आहे. कोणीही ते एकट्या रिकी पॉन्टिंगला देत नाहीय.’
 
मैदानावर कर्णधाराची भूमिका सर्वात महत्त्वाची
 
मैदानावर कर्णधाराची भूमिका सर्वात महत्त्वाची असते आणि त्याला विजयाचे श्रेय मिळाले पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी केकेआर चॅम्पियन झाल्यानंतर, मार्गदर्शकाची भूमिका बजावणार्‍या गौतम गंभीरचे सर्वत्र कौतुक झाले. याच मुद्द्याला धरून गावस्कर यांनी गंभीरवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे बोलले जात आहे.
 
श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये १७४.५० च्या स्ट्राईक रेटने ४३५ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. अय्यरने २०१४ नंतर पहिल्यांदाच पंजाबला प्लेऑफमध्ये नेले आहे. या हंगामात १२ सामन्यांत ८ विजयांसह पंजाब देखील जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

Related Articles