दशरथाच्या नकाराने विश्‍वामित्रांचा संताप   

भावार्थ रामायणातील कथा, विलास सूर्यकांत अत्रे

श्रीराम हा वैरागी आहे. तो सच्चिदानंद आहे. तो पुरूषोत्तम आहे. तो निराकार आहे. तो निर्विकार आहे. तो कालातीत आहे, केवळ लोकरक्षणार्थ, दीन दुबळ्यांना तारण्यासाठी त्याने अवतार घेतला होता. विश्‍वामित्र हे ब्रह्मपदाला पोहोचलेले ऋषी होते. त्यांना यज्ञ करायचा होता; पण ते यज्ञ करीत असताना राक्षस सतत विघ्न आणत होते. याज्ञीक झालेले विश्‍वामित्र राक्षसांना शापही देऊ शकत नव्हते. विश्‍वामित्रांच्या यज्ञाची त्यामुळे सांगताच होत नव्हती. 
 
अवतारी असलेला रामच या राक्षसांचे पारिपत्य करू शकेल आणि आपला यज्ञ पूर्ण होईल, अशी विश्‍वामित्रांची खात्री होती. त्या उद्देशानेच एके दिवशी विश्‍वामित्र अयोध्येत दशरथाकडे आले होते. विश्‍वामित्रांचे आगमन झाल्याचे पाहून दशरथ स्वागतासाठी त्यांना सामोरा गेला, विश्‍वामित्रांना त्यांना लोेटांगण घातले, त्यांची पाद्य पूजा केली. त्यांना सोन्याची फुले अर्पण केली. गोदान केले. विश्‍वामित्र आले आहेत असे समजताच विश्‍वामित्रांना भेटायला वसिष्ठ ऋषीही आले. दोघेही ब्रह्मऋषी, त्या दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले. एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. ते दोघे ब्रह्मज्ञानी असल्यामुळे पुढे काय घडणार आहे हे त्यांना ज्ञात होते.
 
दशरथ विश्‍वामित्रांना म्हणाला, ऋषीवर्य तुम्ही ब्रह्मर्षी आहात, तुम्ही प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. तुमच्या आगमनाने अयोध्या नगरी धन्य झाली.
तुमचे येणे म्हणजे आमच्या सूर्यकुळाचा सन्मान आहे, आमचे गोत्रच उद्धरायला तुम्ही आला आहात. दोन दोन ब्रह्मर्षींचे कृपाछत्र आम्हाला लाभले आहे. हे माझे परमभाग्यच आहे. हे ऋषिवरा तुमचे मनात काय आहे ते मला सांगा. तुम्ही कोणत्या उद्देशाने, कोणत्या कामासाठी आला आहात ते मला कळू द्या. तुम्ही मागाल ते तुम्हाला हा सूर्यकुळातील दशरथ आनंदाने देईल. दशरथाने दिलेल्या आश्‍वासनांमुळे विश्‍वामित्रांना आनंद झाला. आपला दशरथाकडे येण्याचा उद्देश फलद्रूप होईल याची त्यांना खात्री वाटली. दशरथाच्या शब्दांनी विश्‍वामित्र सुखावले होते, अश्‍वस्त झाले होते.
 
विश्‍वामित्र दशरथाला म्हणाले, राजा दशरथा खरच तू थोर राजा आहेस, तू धैर्यवान आहेस, शूर आहेस, पराक्रमी आहेस. तुझ्या धैर्याचे, गांभिर्याचे, शौर्याचे, पुरूषार्थाचे कौतुक स्वर्गात देवादी देवही करीत असतात. तू महापराक्रमी आहेस. तू स्वर्गावर स्वारी करून प्रत्यक्ष दैत्यगुरूंचा पराभव केलास, शुक्राचार्याला जिंकलेस. आज मात्र मी जो आलो आहे, ते पैसा, धन, धान्य, प्राकृत गोष्टींची मागणी करायला आलेलो नाही. मला तुझ्याकडून आज वेगळीच अपेक्षा आहे. मला माझा यज्ञ पूर्ण करण्याचा आहे. यज्ञात राक्षस विघ्न आणत आहेत. त्यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय मी योजलेले कार्य पुरे होणार नाही. त्यासाठी एका शूर पराक्रमी धनुर्धराची मदत हवी आहे. यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांशी युद्ध करून त्यांचा बंदोबस्त करू शकणार्‍या नरविराची मला गरज आहे. हे काम एकजण पूर्ण करू शकेल तो म्हणजे तुझा पुत्र श्रीराम. त्या राक्षसांचा बंदोबस्त तो एकटा करू शकेल याची मला खात्री आहे. त्याला माझ्या यज्ञात येणार्‍या विघ्नांचे हरण करण्यासाठी माझ्या सोबत त्याला पाठवावे. माझी एवढीच मागणी आहे.
 
राम हा दशरथाचे सर्वस्व होता. त्याचा जीव की प्राण होता. रामाशिवाय दशरथाच्या आयुष्यात कोणताच राम नव्हता. त्याचे जीवन शून्य होते. अशा रामाला विश्‍वामित्रांच्या स्वाधीन करायचे होते, तेही राक्षसांशी युद्ध करण्यासाठी. लहानशा कोवळ्या रामाचा तिथे कसा पाडाव लागणार होता? विश्‍वामित्राची मागणी दशरथाने ऐकली; मात्र पुत्रप्रेमाने त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्याच्या मनाची तळमळ सुरू झाली. त्यात साक्षात विश्‍वामित्र समोर उभे होते. त्यांना नाही कसे म्हणायचे याचा दशरथाला प्रश्‍न पडला होता. दशरथाला काही समजेनासे झाले. तरीही बळेच अवसान आणून चतुरपणे दशरथ विश्‍वामित्रांना म्हणाला, हे मुनीवर यज्ञात विघ्न करणारे सारेच भयंकर, उग्र, क्रूर, बलाढ्य राक्षस आहेत. राम अजून लहान आहे. त्याचे धनुर्विद्येचे शिक्षणही झालेले नाही. श्रीरामाने अजून रणांगण पाहिलेले नाही. तो पहिलेच युद्ध राक्षसांशी कसा करू शकेल? राक्षसांचे पारिपत्य तो कसा करू शकेल? राक्षसांपुढे त्याचा कसा टिकाव लागेल? तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही श्रीरामाला तुमच्या सोबत नेण्याची मागणी करू नका. या मागणीशिवाय जे-जे तुम्ही मागाल, ते-ते सर्व मी तुम्हाला देईन.
 
दशरथाने दिलेल्या नकाराचा विश्‍वामित्रांना क्रोध आला आणि ते क्रोधित स्वरात म्हणाले, अरे, आधी तर म्हणालास, मला काय पाहिजे ते देतो आणि मागणी ऐकल्यावर आता नाही म्हणतोस? अरे तू सूर्यकुळाचे नाव सांगतोस त्या सूर्यकुळाचे तू दूषण आहेस.सूर्यवंशातील तुझे पूर्वज सारे धर्मपरायण होते, वचनाला जागणारे होते. तू मात्र अधर्मी झाला आहेस. अरे हरिच्चंद्राने स्वप्नात दान दिले. त्या स्वप्नात दिलेल्या दानापासून जागृतीत आल्यावरही तो ढळला नाही. त्या थोर वंशाला तू कलंक आहेस. तुझ्याच वंशातला शिबी राजा आश्रीत आलेल्या पक्षाचा जीव वाचविण्यासाठी त्या पक्षाच्या वजनाइतके स्वत:चे मास त्याने कापून दिले अणि दिलेला शब्द पुरा केला. त्या थोर वंशाला तू कलंक आहेस. याच वंशातील मुचकुंदाने इंद्राला सहाय्य करण्यासाठी तारकासुराशी घनघोर युद्ध केले. त्या थोर वंशाला तू कलंक आहेस. त्याच वंशात जन्म घेऊन तू तुझ्या पूर्वजांना लाज आणली आहेस. तू वंशाचा दूषण झाला आहेस, सूर्यवंशाला तू काळिमा फासला आहेस. अरे तू रामाला बाळ म्हणवतोस? श्रीराम तर अवतारी पुरूष आहे. तो राक्षस कुळाचा काळ आहे. त्याला जन्मजात सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. 
 
त्याला धनुर्विद्याही चांगली येते. तो परम शूर आहे, तो मानव नाही. तू हे सारे वसिष्ठांना विचार ते सर्व काही सांगतील, असो तुझी मर्जी. निघतो, असे म्हणत विश्‍वामित्र बाहेर पडले. त्यांना निघताना पाहून वसिष्ठ दशरथाला म्हणाले, दशरथा, विश्‍वामित्रांचा असा क्षोभ ओढवून घेऊ नकोस. तू विश्‍वामित्रांना शांत कर. ते म्हणतात ते खरे आहे. राम हा अवतारी पुरूष आहे. तो महापराक्रमी आहे. राक्षसांचा विशेषत: रावणाचा विनाश करण्यासाठीच परमेश्‍वराने अवतार घेतलेला आहे. विश्‍वामित्रांचे विघ्न दूर करण्यास एकटा राम समर्थ आहे. तू तुझ्या मनातील शंका दूर कर.पाहिजे तर तुझे दोन पुत्र त्यांच्या सोबत दे. दशरथाने वसिष्ठ ऋषींच्या आज्ञेचे लगेचच पालन केले. विश्‍वामित्रांना त्याने थांबविले, त्यांंची त्याने क्षमा मागितली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. रामाबरोबर लक्ष्मणालाही पाठवितो असे सांगितले. विश्‍वामित्र संतोषाने दशरथाला म्हणाले, माझ्यासाठी तर एक राम पुरेसा होता, आता लक्ष्मणही मिळाला. माझे भाग्य फळफळले. तू सूर्यवंशाचे आज रक्षण केले आहेस, वंशाला काळिमा लागून दिला नाहीस; दशरथाने राम-लक्ष्मणाला पाचारण केले. राम लक्ष्मण यांना पाहून विश्‍वामित्रांचे सात्विक भाव जागृत झाले होते. अतिशय प्रेमाने विश्‍वामित्रांनी राम-लक्ष्मणाला जवळ घेऊन अलिंगन देत, आशीर्वादही दिला.
(आधार संत एकनाथकृत भावार्थ रामायणबालकांड।सीं; अध्याय ८)

Related Articles