शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर   

बैल घटले, मजूर मिळेनात, खर्चात वाढ!

पुरूषोत्तम मुसळे 

भोर : दिवसेंदिवस बैलांची घटणारी संख्या तसेच मजूरांची कमतरता आणि वाढलेल्या मजूरीमुळे मागील काही वर्षात तालुक्यातील पारंपारिक शेती मागे पडली असून कामासाठी विविध यंत्राचा वापर वाढला आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडील थेट हस्तांतरण योजनेतील मागील पांच वर्षाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. तर पशुधन विभागाकडील बैलांच्या घटत्या आकडेवारीने त्याला दुजोरा मिळत आहे.यांत्रिकीकरण आणि संगणकीय बदलामुळे मानवी कष्टाला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न शेतीमध्ये झाल्याचे दिसत आहे. वाढता खर्च व वेळेमुळे बैल व मजूरांकरवी पारंपारिक शेती पद्धत कालबाह्य होण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. अगदीच दर्गम व डोंगराळ आणि रस्ता नसलेल्या ठिकाणी पारंपारिक शेती सुरू आहे. पूर्वी ज्याच्याकडे बैलजोडी, औत जास्त तो शेतकरी मोठा असा समज होता, पण अलिकडे ज्याच्या दारात ट्रक्टर व आधुनिक साधने जास्त तो मोठा व सधन शेतकरी म्हणून पाहिले जाते. आता ‘मानवी कष्टावर यंत्र ठरतात भारी, चुटकीसरशी कामे करतात सारी’ असे शेतकरी म्हणत आहेत.

ट्रॅक्टर सर्व कामासाठी उपयुक्त 

ट्रक्टरचलीत अवजारांमध्ये रोटाव्हेटर चिखलणी, कुळवणी, भरडी मशीन भात, भुईमूग, सोयाबिन, पेरणीयंत्र सर्व धान्य पेरणी व खताची मात्रा देणे, नांगर डबल फनाडी यंत्र, पॉवरटीलर चिखलणी, आंतरमशागत, कंबाईन हार्वेस्टर कापणी, मळणीपासून ते पिक पोत्यात भरण्यापर्यंत काम चापकटर अर्थात पुट्टी मसीन गवत, कडबासाठी वापर सर्व प्रकारच्या किटक व तननाशकांसाठी स्प्रे पंप, पाँवरवेटर फळबाग ते आंतरमशागतीसाठी छोट्या शेतकर्‍याला खूप उपयोगी. मल्चिंग पेपरचा वापर करून पिक घेतले, तर खुरपणी व बेननी, मशागतीचा वेळ व खर्च होत नाही. सर्व कामे आधुनिक यंत्राने कमी वेळेत व कमी श्रमांत होत आहेत.त्यामुळे बैल व मजूरांचा वापर आपोआप खूप कमी झाला आहे.

तालुक्यात वाटप यंत्र

२०२१ ते मार्च २०२५ अखेर तालुक्यात ५० व ७५ अनुदानातून वाटप झालेली यंत्र,अवजारे पुढीलप्रमाणे आहेत. ट्रॅक्टर११६, ट्रॅक्टर चलीत अवजारे (रोटाव्हेटर, भरडी मशीन, पेरणी यंत्र, नांगर) ४११, कंबाईन हार्व्हेस्टर ५, पॉवर टिलर ४१, चाफ कटीर ३६, पावर वीडर १९, भात कापणी यंत्र, छोटी राईस मिल ६, भात लावणी यंत्र २, इलेक्ट्रीक मोटार ४९ अशी एकूण ७४५ यंत्राचे वाटप झाले आहे. त्यासाठी संबंधीत शेतकर्‍यांना ५ कोटी, १० लाख ४७ हजार ७४० रूपये अनुदान मिळाले आहे.‘बैलांचा खर्च त्यासाठी द्यावा लागणारा वेळ तर मजूरांची शोधाशोध, मजूरी यापेक्षा यंत्राने कमी वेळेत व कमी श्रमात, किफायशीर, खात्रीशीर काम करता येते’ - सोपान पांगारे, वेळू लक्ष्मण खुटवड, उंबरे, शैला डाळ, वडगाव बुद्रुक. महेंद्र सोनवणे, न्हावी. काशिनाथ नांदे, आळंदे (शेतकरी)
 
 ‘सरकारने थेट हस्तांतरण योजनेतंर्गत अनुदान दिल्यामुळे शेतकरी यंत्र व औजारे घेण्याकडे वळतो आहे.त्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढताना दिसते आहे.
 
- शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी

बैल कमी, मजुरी वाढली 

ग्रामीण भागात एकेकाळी शेतकर्‍यांचा मित्र आणि पोशिंदा अशी बैलांची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षात बैलांच्या संख्येतही झपाट्याने घट झाली आहे. चारा, वैरण, गवत, पेंड, खाद्यांचे दर सतत वाढत आहेत. त्यांचा संभाळ व देखभाल करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, शेतकर्‍याकडे नाही. अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. आजारपणावर वेळेत औषधोपचार मिळत नाहीत. दुसरीकडे शेतीत कामासाठी मजूर, गडी मिळणत नाही. सालगडी तालुक्यात फारसे नाहीत. मजूरांना शेतीपेक्षा बाहेर जास्त पैसे मिळतात. कमी वेळ आणि कमी श्रमात जास्त पैसे मिळू लागल्याने शेतीऐवजी कारखाना किंवा इतर कामाला मजूर प्राधान्य देत आहे. मजूरीचे पुरूष सरासरी ४०० ते ६०० तर महिला ३०० ते ४०० रूपये दर आहे. महसूल विभागाकडील अहवालानुसार तालुक्यात ७९१२४ शेतकरी, तर पशुधन विकास विभागाच्या माहितीनुसार बैलाची संख्या तीन हजाराच्या आसपास आहे.खरीपाचे क्षेत्र १७४६५ हेक्टर असून त्यामध्ये भात ७५००, नाचणी १३००, सोयाबीन ३००० हेक्टरचा समावेश आहे.रब्बीचे क्षेत्र १०८७१ हेक्टर असून त्यामध्ये ज्वारी ७५४० हेक्टर आहे. 
 

Related Articles