पाकिस्तान मानवतेसाठी धोका : ओवेसी   

हैदराबाद : पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशततवाद आता मानवतेसाठी मोठा धोका बनला आहे. हाच संदेश मी जागतिक मंचावर प्रखरपणे मांडणार असल्याचे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी सांगितले. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या शिष्टमंडळात ओवेसी यांचा समावेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, निष्पाप नागरिकांची कत्तल पाकिस्तानचे दहशतवादी करत आहेत. आता त्यांची कोणतीही गय करण्याची गरज नाही. त्यांचा सर्वनाश करण्याची वेळ आली आहे. भारत दहशतवादाचा मोठा शिकार झाला आहे. पाकिस्तानचे हुकूमशाह झिया उल हक पासून नागरिकांच्या कत्तलीचा तमाशा आपण पाहात आलो आहोत. त्यामुळे दहशतवादाची निंदा करावी तेवढी थोडीच आहे. 
 
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय, लष्कर यांनी दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. दोघेही भारताला अस्थिर करु पाहात आहेत. त्यामुळे माझा पाकिस्तानवरचा विश्वास केव्हाच उडाला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारकडून मला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर राजनैतिक पातळीवर जगाला काय सांगायचे आहे ? याचा तपशील मिळालेला नाही. 
 
दरम्यान, केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर ओवैसी यांनी सरकारला विविध विषयांवर फैलावर घेतले होते. आता पाकिस्तानविरोधात ते सरकारच्या बाजूने कसे उभे राहिले ? याबाबत ते म्हणाले, भाजपला माझा राजकीय तात्विक विरोध आहे आणि राहणार आहे. पण, दहशतवादाच्या विषयावर माझी भूमिका वेगळी आहे.  देशाच्या निष्पाप नागरिकांची हत्या दहशतवादी करत असतील तर माझ्या राजकीय तत्त्वांचा या ठिकाणी संबंध येत नाही.  कारण दहशतवाद्यांनी देशाच्या नागरिकांना वेचून ठार मारले आहे. प्रकरण संपूर्णत: देशाशी संबंधित आहे एक राजकीय पक्ष म्हणून माझा भाजपशी लढा सुरूच आहे. 
 
दहशतवादाविरोधात तुम्ही सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांच्या रागाचे प्रतिनिधित्व करत आहात का ? यावर ते म्हणाले, होय मी निश्चित करत आहे आणि ते का करु नये ? कारण आमचा पक्ष भारतीय मुस्लिम धर्मीय नागरिकांचा आहे. मी भाजपच्या तत्त्वांना विरोध करत असलो तरी दहशतवादी भारतातील निष्पाप नागरिकांची हत्या करत असतील तर माझ्या त्याबद्दलच्या भावनांचा विचार केला तर माझा धर्म कोणता ? हा विषयच येत नाही. 
 
सर्व भारतीयांचा एकाच नौकेतून प्रवास
 
सर्व भारतीय आता एकाच नौकेतून प्रवास करत आहेत, असे मी मानतो. त्या नौकेला कोणी छिद्र पाडत असेल तर नौका निश्चितच बुडेल. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व भारतीयांनी एकत्र येत दहशतवाद रुपी वादळाचा एकत्रित सामना करण्याची गरज आहे. आपले मतभेद आपण नंतर देखील सोडवू शकतो. भारताची आर्थिक प्रगती पाहून जळफळाट झालेला पाकिस्तान भारतात दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान रचत आला आहे. त्यासाठी धार्मिक वाद निर्माण करण्याचे उद्योग तो नेहमी करतो. पाकिस्तानी लष्कराचे आणि दहशतवाद्यांचे तसे अलिखित धोरण आहे. त्यामुळे भारताला अस्थिर करणार्‍या प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले. 

Related Articles