भाषेचे बोट सोडू नका   

डॉ. नीलिमा गुंडी यांचे प्रतिपादन 

पुणे : भाषा हाच समाजव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. तसेच, भाषा ही कला, व्यवहार व शिक्षणाचे माध्यम आहे. दैनदिंन जीवनात भाषेला मोठे स्थान आहे. भाषा त्रिकालदर्शी असून त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. भाषा ही संस्कृती स्मृती असून साहित्य व काव्य यांच्या केंद्रस्थानी आहे. भाषेचा प्रवास हा शेकडो वर्षांपासूनचा आहे. भाषेची नाळ आजच्या संस्कृतीशी जोडली आहे. त्यामुळे भाषा व संस्कृतीचे जतन व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी शनिवारी केले. आजच्या काळात लोकांनी भाषेचे बोट सोडले असून ते योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. 
  
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ’वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यानात ’भाषा, कविता आणि संस्कृती’ या विषयावर डॉ. गुंडी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भाषा ही विविध काव्यसंग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहे. अनेक कविंनी आपल्या कवितेतून वैविध्यपूर्ण भाषेची मांडणी केली आहे. भाषा ही समकालिन असून काळानुसार त्याचे शब्द बदलत असतात. आधुनिक कवितेचे जनक ’केशवसूत’ यांनी पुढच्या पिढीतील लोकांना समजेल अशा शब्दात कविता लिहिल्या. त्याद्वारे भाषेला विविध संस्कृतीशी जोडण्याचा त्यांनी विशेष प्रयत्न केला. केवशसूतांच्या कविता शंभर वर्षांपासून लोकांच्या ओठांवर रेंगाळत आहेत, असेही डॉ. गुंडी यांनी नमूद केले. 
   
विश्वाला गवसणी घालण्याचे काम भाषेच्या माध्यमातून कविंनी केले आहे. भाषा कुठलीही असो ती टिकली पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी अनेक कवी, लेखकांनी विशेष प्रयत्न केले आहे. जगाला बदलून टाकण्याची ताकद भाषांमध्ये आहे. कवी ’कुसुमाग्रज’ यांनी स्वातंत्र्यवीरांवर अनेक कविता केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी त्यांचे बलिदान, देशप्रेमाच्या व साहसाचे वर्णन केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानात भाषा कशी बदलत गेली, याबाबत कविंनी संस्कृतीच्या पटलावर कवितांची तात्वीक मांडणी केली आहे. स्त्रीला आपले दु:ख व्यक्त करण्याची मुभा नाही. त्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा आधार घेतला. स्त्रीयांचे दु:ख किती खोलवर रूजले आहे, हे सांगण्याचा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी प्रयत्न केला. स्त्रीयांचे दु:ख म्हणजे एकप्रकारचे व्रत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न कवयित्री इंदिरा संत यांनी केला आहे. भाषा ही श्रेष्ठ असून  ती जपली पाहिजे, असेही डॉ. गुंडी म्हणाल्या. 
 
दहा ते पंधरा वर्षापासून कविंनी कवितेतून स्त्रीची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला. त्यात अरूण कोलटकर, सौमित्र यांचे नाव घेता येईल. ग्रामीण व दलित साहित्यावरही भाषेचे प्रभूत्व आहे. कवी नारायण सुर्वे यांनी ’भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ या ओळीतून भाषेचे महत्व विशद केले. कवी नामदेव ढसाळ यांनी समाजातील उपेक्षितांचा आवाज कवितेतून बुलंद केला. मराठी भाषेला परिपक्व रूप देऊन माणुसपणाचे दर्शन घडविले. कवी हेमंत दिवटे यांनी काव्यातून सांस्कृतिक पेचप्रसंग मांडले. रामदास नेहुलकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

Related Articles