शिरुर तालुक्यात खरिपाची लगबग   

रांजणगाव, (वार्ताहर) : अवकाळी आलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. या उघडीपीमुळे शेतकर्‍यांना शेतीची मशागत करण्यासाठी वेळ मिळाला असून, शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.
 
सध्या कडक उन्हामुळे वाफसा झाल्याने शेतकरी वर्गाने खरीप हंगामाच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात शेणखत पांगवणे, नांगरणी, फळी मारणे अशा कामांना सुरुवात केली आहे. काही शेतकरी बी-बियाण्यांची खरेदी करत आहेत, तर काहींनी अगोदरच पेरणी सुरू केली आहे. मे महिन्याच्या शेवटी सामान्यत वळवाच्या पावसाचे आगमन होत असते, परंतु यंदा अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे अनेकांचे अंदाज चुकले.
 
प्रगतिशील शेतकरी दौलत नरवडे म्हणाले, मे महिना हा बहुतेक शेतकरी आपल्या शेतीची पूर्व मशागत करत असतात. यंदा मात्र अचानक आलेला पाऊस आणि तोही सलग राहिल्यामुळे शेतीची कोणत्याच प्रकारे मशागत करता आली नाही. त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तणही वाढले आहे. मशागतीसाठी जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा होता. आता तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकर्‍यांची पूर्व मशागतीची लगबग सुरू झाली आहे. काही शेतकरी नांगरट करत आहे, तर काहींनी नांगरणी न करता पाळी मारून लगेच बाजरी व मुगाची पेरणी सुरू केली आहे.
 

Related Articles