ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान   

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सात लाखांहून अधिक नागरिकांना पावसाचा फटका बसला असून आतापर्यंत ४३ जणांना प्राण गमवावे लागले आहे. आसाममधील ११ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून मिझोराममधील १० जिल्ह्यांत चार दिवसांपासून शाळा बंद आहेत.
 
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोरामसह अन्य राज्यांत पूरस्थिती आहे. आसाम आणि मणिपूरातील नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मणिपूरमध्ये ३,३६५ घरांचे नुकसान झाले आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्र आणि बराकसमवेत १५ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांत पूरस्थिती आहे. त्याचा सात लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून यात अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
आसाम आणि मेघालयात मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांतील पूरस्थिती गंभीर बनली आहे. आसाममधील २१ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून ६.३२ लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. हवामान विभागाने आसाममधील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत. रेल्वे आणि विमान सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. यंदा मान्सूनचे केरळसह अनेक राज्यांत लवकर आगमन झाले आहे. सध्या मान्सूनची गती मंदावली असून ११ जूननंतर मान्सून पुन्हा जोर पकडणार आहे. 
 
सिक्कीममध्ये दरडी कोसळण्याच्या अनके घटना घडल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या १७०० हून अधिक जणांचा सुटका करण्यात आली आहे. सिक्कीमच्या छाटेनमधील एका लष्करी तळावर दरड कोसळल्याने तीन जवानांना प्राण गमवावे लागले असून सहा जवान बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी छाटेनमध्ये दाखल झाली आहे.
 
तीस्ता नदीत एक मोटार वाहून गेली. या मोटारीतील आठ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. २९ मे रोजी रात्री ही घटना घडली होती. या मोटारीत ११ जण होते. त्यापैकी, दोघांची सुटका करण्यात आली. तर, एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य आठ जणांचा शोध सुरु आहे.मेघालयात एनडीआरएफचे जवान इंदूरमधील एका महिला पर्यटकाचा शोध घेत आहेत. सोनम ही पती राजा रघुंवशीसोबत पर्यटनासाठी आली होती. राजा आणि सोनम २३ मे पासून बेपत्ता आहेत. राजा याचा मृतदेह हाती लागला असून सोनम अद्याप बेपत्ता आहे.
 
आसाममध्ये पूर किंवा पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. आतापर्यंत ३१ हजार २१२ जणांनी निवारा केंद्राचा आश्रय घेतला आहे. पूरग्रस्त भागात नागरिकांना पिण्याचे पाणी आणि भोजन पुरविले जात आहे. मणिपूरमध्ये १.६४ लाख नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. तर, ३५,१४३ घरांचे नुकसान झाले आहे. पूरात अडकलेल्या चार हजार नागरिकांची सुटका करण्यात आली असून ७७ तात्पुरते निवारा शिबिर उभारण्यात आले आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्री तसेच मणिपूरच्या राज्यपालांशी संवाद साधताना पूरस्थितीचा आढावा घेतला. पुरात वाहून गेल्याने किंवा दरड कोसळल्याने आतापर्यंत आसाममध्ये १७, अरुणाचलमध्ये ११, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ३ तर त्रिपुरात एकास प्राण गमवावे लागले.
 

Related Articles