राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारणार : उपमुख्यमंत्री पवार   

पुणे : रोजगाराच्या माध्यमांतून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्यासाठी कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
टाटा ग्रुप, नगर विकास विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन प्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीईओमी टेक विद्यापीठाचे कुलगुरु सुनील भिरुड, टाटा टेक्नोलॉजी कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले उपस्थित होते.
 
पवार म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षणाला काळानुरुप बनविण्याची गरज होती. कृत्रिक बुद्धिमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टिने टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्रासाठी टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्यसरकारने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील केंद्रासाठी टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्यसरकारकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कल्याण-डोबिंवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. 
 
पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलिकडच्या काळात पिंपरी-चिंचवड, पुणे शहराला देखील औद्योगिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा विकास होताना आयटी पार्क सारख्या संस्था स्थापन झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्य माध्यमांतून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून पवार म्हणाले, बाणेर येथील केंद्रात युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगधंद्यात कुत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच प्रात्यक्षिकही दिले जाणार आहे. त्यामुळे युवकांना त्यांच्या स्वच्छेप्रमाणे रोजगार तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. या प्रकल्पाची इमारत डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करण्याची सूचना त्यांनी केली.पणन आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबत औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणार्‍या कौशल्यवर्धन केंद्रातून, दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे मनपाकडून १ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रास्ताविक भाषणात त्यांनी सांगितले. 

Related Articles