उड्डाणपुल, रस्ते बांधून वाहतुकीचा प्रश्न सुटत नाही   

पुणे : रस्ते बांधून वाहतूक कोंडी सोडविणे म्हणजे पेट्रोल टाकून आग विझविण्यासारखे आहे. पायाभूत सुविधा वाढल्या की वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे उड्डाणपुल बांधून, रस्ते वाढवून वाहतूक कोंडी सुटत नाही, तर ती वाढत जाते. वाहतूक कोंडी हा तांत्रिक नसून सामाजिक प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल, तर शहराचे लोक केंद्रीत नियोजन केले पाहिजे. ज्या शहरात वाहनांपेक्षा लोकांना महत्त्व दिले जाते. तीच शहरे सर्वार्थाने उत्तम असतात. असे प्रतिपादन वाहतूक अभ्यास रणजित गाडगीळ यांनी शुक्रवारी केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘शहर वाहतूक-आव्हाने आणि पुढील मार्ग’ या विषयावर रणजित गाडगीळ बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून खासगी वाहनांची संख्या कमी करणे हा वाहतूक कोंडीवरचा उत्तम पर्याय आहे. रस्त्यांवरील वाहने कमी झाली की, बरेच प्रश्न सुटतात, असेही गाडगीळ यांनी नमूद केले. 
 
गाडगीळ म्हणाले, पुण्यात वाहतूक कोंडी आणि रहदारीचे संकट आहे. वाढलेल्या वाहन संख्येमुळे प्रदूषणही वाढले आहे. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. देशात वर्षाला २१ लाख तर पुण्यात ३.५ हजार लोकांना प्रदूषणापासून होणार्‍या आजाराचा सामना करावा लागत आहे. रस्ते अपघातात देशात वर्षाला १ लाख ७० हजार लोकांचा जीव जाते. तर ५ लाख लोक जखमी होतात. पुण्यात रोज एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. आतापर्यंत शहरात पीएमपी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होती. मात्र, मागील चार वर्षांत पीएमपी बसची संख्या ५० ने वाढली आहे. त्यामुळे पीएमपीच्या प्रवासी संख्येतही घट झाली असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. 
 
एक लाख लोकसंख्येमागे ५० बस असे सक्षम सार्वजनिक वाहतूकीचे सुत्र आहे. मात्र, पुण्यात एक लाख लोकसंख्येमागे २५ बस आहेत. पुणे हे देशातील एकमेव शहर आहे की जिथे लोक रस्त्यावर कोणत्याही वेळी विनाशुल्क गाडी लावतात. अशा गाड्यांमुळे रस्त्यांवरची जागा अडली जाते. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. शहराचा मध्य भाग हा लोकांसाठी आहे. मात्र, तो आता वाहनांचा झाला आहे. त्यामुळे या भागात पायी चालणेही कठीण झाले आहे. सायकलींचे शहर अशी ओळख असणारे पुणे आता जगातील प्रदूषित आणि वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. केवळ हा चुकीच्या शहर नियोजनाचा फटका असल्याचेही रणजित गाडगीळ यांनी सांगितले. आशितोष नाईक यांनी प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. 
 
दहा वर्षात वाहन संख्येत दुपट्टीने वाढ
 
पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. या शहरात २००५ मध्ये वाहनांची संख्या ८ लाख होती. २०१५ आरटीओकडील नोंदणीनुसार या शहरातील वाहनांची संख्या २३ लाख इतकी होती. २०२५ मध्ये नोंदणीकृत वाहनांची संख्या ४१ लाख इतकी आहे. मागील १० वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. ही वाढ शहरात वाढलेले रस्ते आणि उड्डाणपुलाचा दुष्परिणाम असल्याचेही रणजित गाडगीळ यांनी सांगितले. 

Related Articles