पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त   

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी विनाकारण केलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांना प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या ७६ चौक्या, ४२ आघाडीवरील संरक्षण ठिकाणे आणि तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.पाकिस्तानने ६० भारतीय चौक्या, ४९ आघाडीवरील संरक्षण ठिकाणांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर बीएसएफने ही कारवाई केली. या काळात ४० ते ५० दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक चित्रपाल सिंह यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
 
सुंदरबनी सेक्टरजवळ पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाद्वारे चालवले जाणारे एक प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असेही ते म्हणाले. या भागात सध्या कोणतीही हालचाल दिसून येत नाही. पाकिस्तानातील अनेक दहशतवादी  तळ उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असे बीएसएफचे महानिरीक्षक शशांक आनंदयांनी सांगितले. भारतीय सशस्त्र कारवाईनंतर पाकिस्तानचे सैनिक चौकी सोडून पळताना दिसले, असेही ते म्हणाले. लोणी, मस्तपूर आणि छाबरा येथील तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या सशस्त्र कारवाईत पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याची माहिती गोळा केली जात आहे. पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवरील अनेक गावे रिकामी केली आहेत, असेही ते म्हणाले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राजौरी आणि पूंछसह संवेदनशील भागात बीएसएफ आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. जम्मू, सांबा आणि कठुआमध्येदेखील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 
 

Related Articles