''पाकिस्तानची स्थिती घाबरलेल्या कुत्र्यासारखी''   

मायकेल रुबिन यांनीही केले भारताचे कौतुक 

वॉशिंग्टन : ’ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ लष्करीच नव्हे, तर राजनैतिकदृष्ट्याही स्पष्ट विजय मिळवला आहे, असे मत माजी अमेरिकन अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ फेलो मायकेल रुबिन यांनी व्यक्त केले. मायकल रुबिन यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, या संघर्षात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. पाकिस्तानमधील परिस्थितीची तुलना एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पाकिस्तान आता फक्त युद्धविरामाची याचना करत आहे. याचे कारण म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान केले आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर केंद्रित झाले आहे.
 
रुबिन पुढे म्हणाले, जेव्हा पाकिस्तानी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात, त्यावेळी आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील फरक सांगण्याची गरज नाही. ही पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय व्यवस्थेतील एक युती आहे. जग आता पाकिस्तानकडून त्यांच्या व्यवस्थेतून ही दहशतवादाची घाण काढून टाकण्याची मागणी करेल. 
 
रुबिन यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत लष्करी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, जनरल असीम मुनीर आणि त्यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी खरोखरच त्यांच्या नोकर्‍या टिकवून ठेवू शकतील का, याचा विचार करावा. पाकिस्तानी सैन्य आता एक ’कर्करोग’ बनले आहे, जे केवळ देशाचे राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरच परिणाम करत नाही तर संपूर्ण समाजावर एक ओझे बनले आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 

Related Articles