नेहमीची येतो पावसाळा, पुणेकरांनो स्वतःला सांभाळा!   

समस्याग्रस्त : सुरेश मुरलीधर कोडीतकर

पुणेकरांच्या समस्या अनेक आहेत. त्यावर उपाय योजना तोकड्या आहेत. कारण समस्यांची व्याप्ती आणि आवाका मोठा आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्या मानव निर्मित आहेत. शासन आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा वेळोवेळी उघडा होत असतो. या नाकर्तेपणामुळे अनेक निरपराधांचे जीव जातात हे अत्यंत दुःखद आहे.  डंपरखाली माणसे चिरडली जातात. उघड्या वीज तारांमुळे विजेचा धक्का लागून कोणाचा जीव जातो. उघड्या गटारात पडून कोणी मृत्युमुखी पडतो. रस्त्यांवरील अपघातांबाबत तर बोलायलाच नको.  या विविध कारणांमुळे समस्याग्रस्त पुणे हा पुणेकरांना खंगवणारा विष (क्ष)य आहे की काय असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे. नगर रचना आणि नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, महापालिका हे सगळे विभाग नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आहेत, अशी जनतेची भाबडी धारणा आहे. या विभागांनी जनतेचे जीवनमान सुसह्य करावे आणि त्यांना किमान सोयी निर्धोक उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा वाजवी म्हणायला हवी. 

गाळयुक्‍त चेंबर, मॅनहोल?

पुण्यातील प्रचंड वाहनांची अजस्त्र संख्या आणि त्यांच्यामुळे उद्भवलेली वाहतूक कोंडी यावर चर्चा करण्यासारखे काही राहिलेले नाही. त्याच्यावर शाश्वत आणि ठोस आणि समाधानकारक असे उत्तरही कोणाकडे नाही. मग पर्याय एकच उरतो आणि तो म्हणजे येणार्‍या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असणे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जी भूमिगत गटार यंत्रणा आहे ती प्रवाही राहण्यासाठी जिथे जिथे झाकण अथवा जाळीची चेंबर आहेत ती उघडून त्यातील गाळ, कचरा काढणे अशी कामे आपल्या आजूबाजूला सुरु असलेली आपण पाहू शकतो.  चेंबर मधून गाळ, कचरा काढला जातो तथापि तो तिथून उचलून दूरवर न टाकता तिथेच बाजूला गोळा केला जातो. कालांतराने तोच पुन्हा पावसाच्या पाण्याने चेंबरमध्ये ढकलला जाऊन पुन्हा चेंबर गाळाने भरले जाते. तेव्हा असा गाळ वेळीच उचलला जाऊन चेंबर आणि मॅनहोल वाहते राहतील याची दक्षता प्रत्येक कोठी कार्यालय घेईल का? 
 
पुण्यातील बहुतांश रस्ते हे आता सिमेंट काँक्रीटचे आहेत. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सर्व पाणी  रनऑफ म्हणून वाहते वा तुंबते. रस्ते हे समतल नसल्यामुळे आणि फट तसेच खाच खळगे असल्याने, डांबरी आणि काँक्रीट  यांची सांधे जोड नसल्याने, विविध कारणाने रस्ते खोदून बुजवल्याने, अशास्त्रीय गतिरोधक निर्माण केल्याने अनेक ठिकाणी चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात, वाहन अडकणे-फसणे, बंद पडणे, मानेला- मणक्याला दुखापत होणे असे परिणाम उद्भवतात. पुण्यात पावसाळ्यात नव्याने नद्या अवतीर्ण होतात. पण त्यामुळे इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने बंद पडणे आणि तासंतास वाहन कोंडी होऊन सामान्य नागरिकांची परवड होणे हे अक्षम्य आहे. नागरिक यासाठी आयकर, मिळकत कर, वस्तू व सेवा कर प्रामाणिकपणे भरतात काय? पण हे आज देशातील अनेक शहरातील पावसाळयातील चित्र आहे. पुणे या समस्याग्रस्त शहरांच्या यादीत अग्रेसर आहे. पावसाळा आला की अपघात, वाहने घसरणे, खड्डयात पडून माणसे जख्मी होणे आणि चेंबर-मॅनहोल पाण्याखाली झाकले गेल्याने दिसून न येणे यामुळे तिथे पादचारी पडण्याचा आणि जीव धोक्यात येण्याचे प्रकार संभवतात. याबाबत यंत्रणा काय उपाय योजना करणार आहे? 

नदी, नाले ओढेही गिळंकृत?

पुण्यात वाहणार्‍या विविध नाले, ओढे यांच्या पात्रात अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेले असते. अशा ठिकाणी जुगार, पाळीव कबुतरांची ढाबळ, व्यसनाचे अड्डे, भंगार गोदाम, वाहने धुण्याचे व्यवसाय असल्याचे दिसून आले आहे. हे सगळे कोणाच्या आशीर्वादाने होते? नाले आणि ओढे यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी वा ढगफुटी झाल्यास पाणी शहराच्या दिशेने वेगात वाहत येते आणि नैसर्गिक वहन क्षेत्रफळ मानवी हस्तक्षेपामुळे संकोचल्याने पाणी आजूबाजूच्या वस्तीत पसरते. ओढे, नाले, नदीपात्र यांची लाल आणि निळी पूर रेषा अतिक्रमण मुक्त राहील याबाबत समन्वय आणि कृती कोणी करत आहे का? प्रश्न अनेक आणि उत्तर शून्य या पावसाळी भोवर्‍यात पुणेकर अडकतात आणि जिवितहानी आणि मालमत्ता हानी होते. हे सर्व दुःखद आहे. नेमिची येतो पावसाळा आणि पुणेकरांच्या डोळ्याला दुःखं धारा हे कधी बदलणार? राम नदी नाहीशी झाली. आंबील ओढा कधी उग्र रूप घेईल माहीत नाही. इतर दोन चार ओढे, नाले अंग चोरून आपले आस्तित्व टिकवून आहेत. नदी, नाले, ओढे यांच्या प्रवाह मार्गाला कायमचे संरक्षित करणे ही आपल्या हिताचे आहे. 
 
पावसाळा आणि उघड्या वीज तारा आणि खांब हे सारे नवीन नाही. फ्युज आणि वीज पुरवठा बॉक्स हे नेहमीच सताड उघडे का बरे असतात ? अशा ठिकाणी विद्युत प्रवाह उतरतो आणि अनेकांच्या जीवाला धोका उद्भवतो. विद्युत प्रवाह चुकून पाण्यात उतरला तर काय हाहाकार माजेल याचा विचार कधी विद्युत विभागाच्या लोकांनी केला आहे काय ? पाऊस सुरु झाला की विद्युत पुरवठा खंडीत करणे हेच कर्तुत्व समजणार्‍या महाभागांना जनतेसाठी पावसातील सुरक्षित विद्युत पुरवठा आणि विद्युत साधनांची सुरक्षितता याचे संतुलन कधी साध्य करता येणार ? ज्या निष्पाप लोकांचे प्राण पावसाळ्यात विजेचा धक्का बसून होतात त्यांना नुकसान भरपाई देण्याने विद्युत यंत्रणांची अकार्यक्षमता सिद्ध होत असते. त्यामुळे आला पावसाळा आणि विद्युत पुरवठा टाळा हे धोरण कुचकामी आहे. 

पावसाळा आनंददायी ठरेल?

रस्ते अधिकच खराब होणे, पावसाळीवाहिन्या पुरेश्या न ठरणे, पाण्याचा निचरा न होणे, वाहतुकीचा बोजवारा उडणे आणि यापायी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होणे हे चित्र कधी बदलणार ? नागरिकांच्या गैरसोयीला आम्ही जबाबदार आहोत असे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार ? पुण्यातील परिवहन सेवा गलितगात्र आहे. ज्यांना पर्यायच नाही ते लोक ती वापरतात. पावसाळ्यात वाहतूक थिजल्यावर बस नामक कोंडवाड्यात मुकी बिचारी कुणी हाका अशा पुणेकरांचे काय हाल होत असतील बरे हा प्रश्न आता अप्रस्तुत झाला आहे. कारण हा अनुभव पुणेकरांच्या सहनशीलतेची सत्व परीक्षा घेऊन कोडग्या व्यवस्थांच्या वांझोट्या सुधारणांबाबत पुणेकरांना वज्रासमान करून गेला आहे. पावसाळा हा ऋतू खरंतर आनंदाचा आणि चैतन्याचा उत्सव ठरायला हवा. पण पुण्यात मात्र तो अपघात, धोका, आपत्ती, हानी, कोंडी, गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप देणारा ठरतो. आणि पुढे पर्जन्य पर्यटनही हुल्लडबाजी, गोंधळ, छेडछाड, अपघात जिवितहानी घेऊन येते. यंदाचा पावसाळा हा या सार्‍याने मुक्त आणि पर्जन्य आनंदधारायुक्त असतील का ? हवामान बदलत आहे. पर्जन्यमान अनिश्चित आहे. वाढत्या उष्णतेचे परिणाम आपण सहन करतोय. परिसरात प्रचंड पाऊस, धरणातून सोडले जाणारे पाणी, नाले/ओढे यांना आलेला पूर, शहरातील एकत्रित वाहते पावसाचे पाणी याचा एकत्रित परिणाम पुन्हा पानशेत प्रलय आणू शकतो. 
 
समस्याग्रस्त पुणे अभ्यासताना नागरी प्रश्नांचे जाळे हे रस्ते, पाणी, निचरा, वीज पुरवठा, परिवहन, सुरक्षा, सेवा, आपत्ती प्रबंधन, आरोग्य सुविधा या भोवतीच गुंफले जाते. यातील सर्व कड्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील एकाची अकार्यक्षमता इतर कड्यांवर परिणाम करते. कार्यक्षमता, संनियंत्रण, दक्षता, पर्यवेक्षण, सुरक्षा उपाय योजना, आपत्ती प्रबंधन, प्रथमोपचार तत्पर उपलब्धता हे सारे जर सुचारूपणे लाभले तर कुठेही पावसाळ्यात गोंधळ, गडबड उडून जिवित आणि वित्तहानी होणार नाही. अजून मौसमी पाऊस दूर आहे आणि अवकाळी पावसातच आपली कल्हई उघडी पडत आहे. हे सारे चित्र कधी बदलणार?
 

Related Articles