भारत-पाकिस्तान तणावामुळे सुकामेव्याच्या आयातीवर परिणाम   

पुणे : भारत-पाकिस्तान तणावामुळे अफगाणिस्तान, इराण, इराक आणि पाकिस्तानातून येणार्‍या सुकामेव्याच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. देशात दोन ते तीन महिने पुरेल इतका सुकामेव्याचा साठा शिल्लक असल्याने दर स्थिर आहेत. परंतु तणाव कायम राहिल्यास त्यानंतर दरात वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.
 
देशात लागणार्‍या सुकामेव्यात दरवर्षी ७० ते ८० टक्के आयात सुकामेवा केला जातो. तर भारतातही काही प्रमाणात त्याचे उत्पादन निघते. सध्याच्या तणावामुळे आयातीवर देखील परिणाम झाला आहे. बदाम, खजूर, पिस्ता, अंजीर, काळे मनुके यासह विविध वस्तू आयात केल्या जातात. सरकारने पाकिस्तानमधून येणार्‍या सर्व प्रकारच्या थेट आणि अप्रत्यक्ष आयातींवर बंदी घातली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतात येणार्‍या सुकामेवा आयातीला बसला आहे. यामध्ये अफगाणिस्तानातून होणार्‍या पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
 
सुकामेव्याचे व्यापारी नवीन गोयल म्हणाले, भारत पाक तणावामुळे आयातीवर परिणाम झाला असला तरी साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. भविष्यात तणाव वाढला तर १० ते २० टक्के दर वाढू शकतात. सध्या दर स्थिर आहेत. सर्व व्यापारी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहेत. भविष्यात अफगाणिस्तानातून आयात केला जाणारा सुकामेवा दुसर्‍या मार्गे भारतात आणला जाऊ शकतो परंतु त्याला खर्च वाढेल.
 
तुर्कीच्या सफरचंदावर व्यापार्‍यांचा बहिष्कार 
 
तुर्कीच्या सफरचंदावर भारतीय व्यापार्‍यांनी बहिष्कार घालण्यास सुरूवात केली आहे. तुर्कीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला दिेल्या समर्थनाच्या पार्श्वभूमीवर भारतात बायकॉट तुर्की मोहिमेने जोर धरला आहे. पुण्यातील व्यापार्‍यांनी तुर्कीमधून आयात होणार्‍या सफरचंदाचा बहिष्कार करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुर्कीच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
सुकामेव्याचे दर
 
प्रकार दर ( प्रतिकिलो)
काजू    ७५०ते ८५०
बदाम ७०० ते ९००
पिस्ता ९०० ते १०००
अक्रोड बी १००० ते १४००
आखा अक्रोड ६००
जर्दाळू ४०० ते ६००
अंजीर ७५० ते १२००
खजूर १०० ते ३००

Related Articles