E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
समाज मनाचा कानोसा,सुरेश मुरलीधर कोडीतकर
विवाह हा संस्कार आहे की करार ? विवाह हे बंधन आहे की भातुकलीचा खेळ ? विवाह हे वचन की मौजमजा ? कुटुंब संस्थेचे विविध आधारस्तंभ निर्माण करणारा विवाह संस्कार आजकाल प्रश्नचिन्हांकित झाला आहे. याला केवळ वैष्णवी या विवाहितेच्या हुंडयासाठीच्या छळाचा विषय कारणीभूत नव्हे. कारण माध्यमांनी या ना त्याप्रकारे या विषयाला इतके भडकपणे सादर केले आहे की जणू त्यांनी न्यायालय होऊन शिक्षा सुनावणे बाकी राहिले आहे.. कर्तव्यधीन असलेल्या वर वधूंना विवाह या पवित्र आणि पारिवारिक सोहळ्यात देवादिकांच्या आणि अग्नीच्या साक्षीने एकमेकांचे जीवन साथी निश्चित केले जाते. विवाह हे कुळ, गोत्र, नातेसंबंध, व्यक्तिमत्व पाहून निश्चित करणे अपेक्षित असते. तथापि पूर्वीच्या काळी एकतर विवाह बालपणी ठरवले जात वा दोन्हीकडील ज्येष्ठ परस्पर विवाह ठरवत आणि वधू वर त्याचे पालन करत असत. विवाह संस्थेला कन्यादान आणि वर दक्षिणा हे प्रकार नवे नाहीत. पूर्वी स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी होते. दिल्या घरी मुली सुखी राहा असा नेम जमेल त्या पद्धतीने पाळला जात असे. महिला स्वतंत्र नव्हत्या. चूल आणि मुलं हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरवलेले. काळ बदलला आणि समाज आणि त्याच्या धारणाही बदलल्या. विवाहातील गांभीर्य, आणि नातेसंबधातील जोडलेपणा यातील सख्य हळू हळू कमी होत गेले.
विवाहाचे बाजारीकरण
विवाहात अवाजवी मागण्या करणे, सोनेनाणे, मानपान, कपडेलत्ता यासाठी हट्ट करणे हे प्रकार कालांतराने सुरु झाले आणि त्याला हुंडा नाव लाभले. मुलगी म्हणजे परक्याचे धन आणि तिला हुंडा देऊन उजवले की आपण मोकळे झालो अशी भावना वधू पक्षाच्या डोक्यावरील ओझे व्यक्त करते. हुंडा देणे म्हणजे सोने तोळे स्वरूपात किंवा रोख रक्कम देणे याला महत्व लाभले. विवाहाचा सगळा खर्च वधू पक्षांनी करायचा हे आणखी मिथक समाजानेच मिरवले होते. नंतर नंतर हुंडयासाठी छळाच्या, प्रसंगी मारहाण, आणि जाळून मारणे अशा घटना समाजाला हादरवून टाकू लागल्या. समाजात वर पक्षांचा वरचष्मा असल्याने त्यांना नववधू ही सून यापेक्षा राबणारी बाई आणि मागण्या पूर्ण करणारी दासी वाटत असे. हुंडयासाठी झालेल्या छळात किती सुवासिनींनी जीव गमावला याची गणती नाही. पण जेव्हा विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा न उरता तो श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा देखावा ठरला तेव्हा त्यातील आत्मा नाहीसा झाला. त्यात मग भारी वस्त्रप्रावरणे, दागदागिने, जेवणावळी, संसारोपयोगी वस्तूंची रेलचेल हे सर्व होऊ लागले. श्रीमंत आईबाप लेकीला विवाहप्रसंगी दुचाकी, चारचाकी, सदनिका, मधुचंद्र पॅकेज इत्यादी सर्व देऊ लागले. वधूवरांना विवाह हा इव्हेंट वाटू लागला. विवाह संस्थेचे बाजारीकरण झाले आणि सारे प्रसंग आणि क्षण हे विकले गेले. डेस्टिनेशन वेडींग, प्री वेडींग शूट, मेहंदी, नाचगाणे, अंताक्षरी, माहीतीपट सादरीकरण, गाणे आणि नृत्याचे वाद्यवृंद यांना विवाहात अढळ स्थान प्राप्त झाले.
विवाह प्रदर्शन
हुंडा प्रतिबंधक कायदा पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि त्याने हुंडाखोरांना चाप बसला आहे. तरीही समाजात येनकेनप्रकारे देवघेव होत राहिली आहे. मायभगिनींना हुंडा प्रतिबंधक कायदयामुळे संरक्षक कवच लाभले आहे. विवाह सोहळ्यात मानपान, झाल, रुखवत, गोडाधोडाच्या पंगती हे सर्व करूनही आपल्या मुलीला सासरी कसे नांदवले जाईल अशी चिंता वधू पित्याला नेहमी असते. पण मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत गेले तशी परिस्थिती बदलत गेली. समाजात जाणीवा, स्त्रीपुरुष मोकळेपणा वाढीस लागला आणि वातावरण काहीसे सैल झाले. समाजात पूर्वीही सरसकट हुंडा प्रथा पाळली जात नसे आणि आजही पाळली जात नाही. तरीही ज्या काही घटना घडल्या आहेत त्याने समाज कायम व्यथित झालेला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा हा पूर्वी कलम ४९८ अ अन्वये ओळखला जात असे. आता भारतीय न्याय संहीता याव्दारे याचा उल्लेख कलम ८० अन्वये ओळखला जातो. त्यामध्ये हुंडा याच्याशी संबंधित विविध प्रकरणे आणि शिक्षेचा उल्लेख आहे. हुंडयासाठी छळ केल्याचे सिद्ध झाल्यास किमान ७ वर्षे तुरुंगवास आणि हुंडाबळी घडल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद कायदयात आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा हा अबलांसाठी बचावाची ढाल आहे. या ढालीने अनेक लेकीबाळींना वाचवले आहे. या कायदयाच्या धाकाने हुंडा घेऊ पाहणारे नरमले होते. हुंडा वा मानपान याचे प्रस्थ कमी झाले होते. मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांनी पडदयावर विवाहाचा जो बाजार मांडला तो समाजाने प्रत्यक्षात साकार केला आणि विवाहाचा अर्थ हरवला.
कायद्याचा दुरुपयोग
काळ पुढे सरकत गेला तशी अबलांची पुढील पिढी शिक्षणाने साक्षर आणि सजग होत गेली. आधुनिकता राहणीमानात आली. संसाराचे प्रशिक्षण बाजूला पडले. स्त्री मुक्तीची हाकाटी दिली गेली. पुरुषप्रधान कुटुंब आणि समाज नसावा म्हणून पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा असा विचार पुढे आला. सुधारणांना कोणाचाच विरोध नव्हता. पण पुरुषांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हे अन्यायकारक होते. स्त्री मुक्ती मर्यादाशील आणि स्त्री स्वातंत्र्य सुसंस्कृत असणे याचा सोयीस्कर विसर पडत गेला आणि पुरुषीकरण लादून घेतल्याने स्त्रियांची स्त्री म्हणून असलेली नैसर्गिक, पारंपरिक ओळख धूसर होत गेली. शिकल्या सवरलेल्या मुली समानतेची भाषा बोलता बोलता कायद्याची भाषा बोलू लागल्या. हुंडा विरोधी कायद्याचा हत्यार म्हणून वापर होऊ लागला. सासरच्यांना धमकवण्यासाठी, मनमर्जी करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग होऊ लागला. यामुळे अनेक मुलांचे आणि त्यांच्या आईबापांचे घर उद्ध्वस्त झाले. आज हुंडाबळीच्या घटनांची चर्चा होते. पण या हुंडाविरोधी कायद्याच्या दुरुपयोगाची चर्चा होत नाही. हुंडा प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करून छळ केला जात आहे असे कोणाला सांगण्याची सोय नव्हती. पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते. अशा घटनांमध्ये किती कुटुंबांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला असेल याची आपल्याला कल्पना नाही. नंतर कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा आला आणि त्यामुळे अन्यायग्रस्त महिलांना हक्क मिळवणे सुलभ झाले. तथापि त्याच्या दुरुपयोगामुळे मुलांचे जगणे अवघड झाले. आज तर लिव्ह इन रिलेशनशीप, एकलकोंडे जीवन, वन नाईट स्टँड, खा प्या मजा करा इथपर्यंत मुलींची मानसिकता येऊन पोहचली आहे. आज विवाह हा मुलीचा प्राधान्यक्रम नाही. प्रापंचिक जबाबदारी नको ही मुलींची धारणा आत्मविश्वासाचा आणि जडणघडणीचा अभाव यामुळे तयार झाली आहे. ती कुटुंबसंस्थेच्या शाश्वतेसाठी धोकादायक आहे.
वैष्णवी, इतर बाजू, समाजपतन
आज राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या वैष्णवी प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत. त्यात हुंडयासाठी छळ आणि मृत्यू हा आणि त्याबद्दल गुन्हा दाखल होणे हा भाग आहे. सोबत इतर अनेक कलमान्वयेही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आपल्या सर्वांपर्यंत ज्या वार्ता येत आहेत त्यात फक्त एक बाजू आहे. प्रकरण भावनाशील झाल्याने पीडित कुटुंबाला सहानुभूती प्राप्त होत आहे. जे झाले त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. गुन्हेगारांना कायद्याने ठरवलेली शिक्षा झालीच पाहिजे. पण हे सगळे एकाएकी झालेले नाही. हुंडा घेणारे जसे दोषी आहेत तसे देणारेही दोषी आहेत. मुलीची जर अंध प्रेमातून चुकीच्या वराची निवड असेल तर तिची कान उघडणी करणे ही माता पित्याची जबाबदारी आहे. मुलाकडील लोक वाटेल ती चंगळवाडी फर्माईश करत असतील तर ती त्यांची चूक नव्हे. त्यांना चटक लावली कोणी ? पाणी डोक्यावरून वाहू लागल्याची जाणीव होताक्षणी वैष्णवीच्या पित्याने थांबायला हवे होते. आपल्या मुलीला माहेरी संरक्षणात ठेवून कायद्याची मदत घ्यायला हवी होती. मुलीच्या सुखासाठी सर्व आईबाप धडपडत असले तरी चांगल्या वाईटाची आणि भल्या बुर्या माणसांची पारख प्रत्येकाला असायला हवी. आज जे काही खुलासे या प्रकरणात पुढे येत आहेत ते समाजाचे अधःपतन स्पष्ट करणारे आहेत. जमिनींची धनदांडग्यांना विक्री, त्यातून आलेला कमिशनचा पैसा, बिन कष्टाच्या पैशाला फुटलेल्या वाटा, संपत्तीचा माज, प्रदर्शनी मनोवृत्ती, पंच तारांकित जीवनाचा हव्यास, बाई, बाटलीचा छंद हे सारे व्यक्ती, कुटुंब, समाज यांच्या बिघडलेल्या दिशा दाखवून देत आहे. पोलिस सर्व पुरावे गोळा करून, धागेदोरे जुळवून आरोपींविरुध्द न्यायालयात गुन्हा शाबित करायची पराकाष्ठा करतील आणि त्यातून सत्य बाहेर येईलच; पण तत्पूर्वी मुलींचे लग्न करण्याबद्दल आता समाजाच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे, तिचे निराकरण कोण करणार ? आधीच विवाह होणे हे दिवसेंदिवस अवघड झाले असताना ही भीती त्यावर आणखी आघात करणार आहे यात शंका नाही.
गरज समाजाच्या निर्धाराची
वैष्णवी प्रकरणातून समाज खडबडून जागा झाला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आजूबाजूला होत आहे. जे तथाकथित लोक समाजाचे पुढारी आणि नेते म्हणून पुढे येऊन चर्चा केल्याचे दाखवत आहेत त्यांना समाजात महत्व नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे हुंडा हा प्रश्न कोणा एका समाजापुरता मर्यादित विषय नाही. सगळ्या पंथात आणि समाजात विवाह प्रसंगी देवघेव ही सामान्य बाब आहे. त्या सामान्य बाबीपुढे हाव, लुट आणि छळ जेव्हा सुरु होतो तिथून पुढे गुन्हा आणि कायदा विभागाचे काम सुरु होते. सासू सुनेचे भांडकुदळ चित्र आता पूर्वीप्रमाणे नाही. प्रत्येक सुनेने आपल्या आई वडीलांप्रमाणे सासू सासर्यांना जपले तर कोणा मुलीला माहेरी डोकावण्याची गरज राहणार नाही. सासू सासरे यांनीही सुनेला मुलीप्रमाणे जीव लावायला हवा. मुलांनी आपल्या पत्नीला सदैव सर्व कामांमध्ये मदत करायला हवी. संसार दोघांचा आहे. दोघांनी मिळून तो उभारायचा आहे ही जाणीव हवी. विवाह हा संस्कार सोहळा म्हणूनच पार पाडायला हवा. अनावश्यक आणि निरर्थक खर्च टाळायला हवा. त्यासाठी आचारसंहीतेची नव्हे तर निर्धार आणि सुधारणांची गरज आहे. आपली आपणच परिवर्तनाची सुरुवात करायला हवी. विवाह आणि संसार यामध्ये सामंजस्य, सहचर्य, सहनशीलता, समायोजन, संयम याला पर्याय नाही.
Related
Articles
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !