लष्कराची वाढती ताकद (अग्रलेख)   

भारताने पाकिस्तानला दिलेल्या तडाख्याची जगभर चर्चा सुरु आहे. विशेषतः भारताची लष्करी ताकद हा जगासाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे. लष्कराने पाकिस्तानची सीमा ओलांडली नाही. भारतीय हवाई दलाने लष्कर आणि नौदल यांच्या समन्वयाने पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आली. आपल्या लष्कराची कमीत कमी जीवितहानी आणि शत्रूचे प्रचंड नुकसान, हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे वैशिष्ट्य ठरले असून  युद्धाच्या घोषणेविना झालेले हे युद्ध भारतासंदर्भातील जागतिक दृष्टीकोनात लक्षणीय बदल करणारे ठरणार आहे. चिनी बनावटच्या पीएल १५ क्षेपणास्त्रांना, जेएफ १७ लढाऊ विमानांना लक्ष्य साध्य करता आले नाही, तुर्कीचे ड्रोन निष्प्रभ ठरली. ‘एस ४००’च्या अभेद्य सुरक्षा कवचामुळे हे शक्य झाले. आता ‘एस ५००’ या कवचाच्या एकत्रित निर्मितीचा प्रस्ताव रशियाने दिला आहे. हा प्रकल्प वेगाने मार्गी लागणे आवश्यक आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली दुटप्पी अमेरिकेने पाकिस्तानला एफ १६ विमाने दिली. भारतीय सशस्त्र दलासमोर त्यांचाही निभाव लागला नाही. चीन आणि अमेरिकेसाठी ही नामुष्की होय! भारतीय बनावटीची, मित्र राष्ट्रांकडून तंत्रज्ञान घेऊन भारताने विकसित केलेली शस्त्रास्त्रे विश्‍वासार्ह आहेत, हा संदेश सर्वत्र गेलाच, त्याचवेळी लष्करी महासत्ता होण्याच्या दिशेने देखील भारताची वाटचाल सुरु आहे, हे स्पष्ट झाले. लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सशस्त्र संघर्षाचे स्वरूप वेगळे असते. यावेळी तंत्रज्ञानाची कमाल दिसली. पाकिस्तान त्याबाबतीत किती मागे आहे, हे सिद्ध झाले. अणु हल्ल्याची भीती दाखवीत दहशतवादी कारवायांची पाठराखण करणे यापुढे पाकिस्तानला शक्य होणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान सूचक आहे. पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर भारताने हल्ला केला. पाकिस्तानने जेथे पहिली आण्विक चाचणी केली तो किराणा हिल्स परिसर तेथून जवळच आहे. याच भागात पाकिस्तानने अण्वस्त्रे ठेवल्याचे सांगितले जाते. त्या भागाला लक्ष्य करण्यात आले नसले तरी पाकिस्तानमधील कुठल्याही ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकतो, हा संदेश भारताने दिला. भारताने हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तानच्या खोडसाळपणाला चोख उत्तर दिल्याने त्या देशाच्या हवाई दलाला अनेक अधिकारी आणि सैनिक गमवावे लागले आहेत.पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही दहशतवादी पोसले, हे जाहीरपणे सांगूनही त्याचे पाश्‍चात्य जगात पडसाद उमटले नाहीत. भारताची प्रगती रोखण्यासाठी त्यांना दहशतवाद हे स्थायी धोरण असलेला पाकिस्तान हवा आहे.
 
सावधगिरी हवीच 
 
भारताने दाणादाण उडविल्यावर गायब असलेले धर्मांध लष्करप्रमुख असीम मुनीर रुग्णालयात जाऊन त्यांच्या सैनिकांची विचारपूस करताना दिसले. सिंधु जलकरार पाळला नाही तर रक्ताचे पाट वाहतील, असे म्हणणार्‍यांना भारताने उत्तर दिले आहे. पाणी आणि रक्त एकाचवेळी वाहू शकत नाही, हे पंतप्रधानांनी ठणकावले आहे. प्रत्येक संघर्षात मानहानीकारक पराभव झाल्यावर पाकिस्तानकडून विजयी झाल्याचा प्रचार केला जातो. हरयानातील आदमपूर हवाई तळाचे नुकसान केल्याचा प्रचार पाकिस्तानने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तळाला भेट देत पाकिस्तानच्या गोबेल्सनीतीला उघडे  पाडले. अमेरिकेला दहशतवाद अथवा त्यात मारले जाणारे निरपराध यांचे काहीही पडलेले नाही. दोन्ही देशांनी संघर्ष थांबवून आपल्यासोबत व्यापार करावा, हे डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट भारताने जे सोसले त्या पार्श्‍वभूमीवर माणुसकीहीन आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर उन्मादाने स्वागत करणार्‍या त्यांच्या येथील सहानुभूतीदारांचे डोळे उघडवावेत, ही अपेक्षा! अचानक झालेली संघर्ष बंदी, संकेत आणि मर्यादांचे उल्लंघन करून ट्रम्प यांनी केलेला उद्योग, यामुळे देशात संताप होता. पंतप्रधानांचे देशाला उद्देशून झालेले भाषण, आदमपूर तळाला त्यांनी दिलेली भेट आणि पाकिस्तानबद्दल घेतलेली भूमिका, यामुळे वातावरण काहीसे बदलले असले तरी अनेक आव्हाने अद्याप कायम आहेत, याची पुरेशी जाणीव भारतीयांना झाली आहे. १९७१ च्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानने छुप्या युद्धाला सुरुवात केली. आता कोणते नवे तंत्र त्याच्याकडून वापरले जाईल, याचा अंदाज घेत अधिकाधिक सजगतेची गरज आहे. 

Related Articles