वाचक लिहितात   

श्रमाला प्रतिष्ठा हवी
 
‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे’ असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले आहे, ते अगदी बरोबर आहे. जग उभारणीच्या महायज्ञात अगणित कष्टकरी, मजूर, कामगार, तंत्रज्ञ यांचे प्रचंड श्रमिक योगदान आहे. या श्रमिकांच्या घामातूनच पृथ्वीला टवटवीतपणा येत असतो. मानवी उत्क्रांतीपासूनच श्रमिकांचे अमूल्य योगदान राहिले आहे; मात्र आता आर्थिक विषमता वाढून जग पुन्हा एकदा अराजकतेकडे मार्गक्रमण करू लागले आहे. समान काम, समान वेतन आणि कामाला प्रतिष्ठा हा श्रमिकांचा सर्वाधिकार पुस्तकातील केवळ ओळी बनून राहिला आहे. अनेक आस्थापनांत श्रमिकांचे शोषण होत असल्याचे दिसते. स्त्री-पुरूष कामगार विषमता वाढत असून कामाच्या मोबदल्यात प्रचंड तफावत दिसते. संपूर्ण जग हे दोन भागात विभागले गेले आहे. एक श्रीमंतांचे जग आहे आणि दुसरे गरीब कष्टकर्‍यांचे जग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा ज्या ९० टक्के असंघटित क्षेत्रातील कामगारांवर पेलला आहे, त्यांचे मासिक उत्पन्न केवळ १२-१४ हजार रुपये इतके आहे. सफाई कर्मचारी आपल्या व्यवस्थेत खिजगणतीत देखील धरले जात नाहीत. कष्टकरी वर्गाला आणि त्यांच्या श्रमाला मिळणारी प्रतिष्ठा हा केवळ ’पुस्तकी’ विषय ठरला आहे. यातून प्रचंड सामाजिक असमानता निर्माण झाली आहे; परंतु समाजाने एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे कष्टकर्‍यांच्या श्रमाला आणि श्रमिकांना प्रतिष्ठा मिळणे बंद झाले आणि त्याचबरोबरच रोमन साम्राज्याच्या पतनाला सुरूवात झाली!
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
विवाहासाठी तडजोड हवी
 
आजची तरुणाई लग्नाच्या बाबतीत उदासीन आहे, तर काहींना लग्न करायची इच्छा असूनही वाढलेल्या अपेक्षांमुळे किंवा तडजोड करायची तयारी नसल्यामुळे योग्य तसा जोडीदार मिळत नाही, तसेच आजकाल कामाच्या वेळा, तणाव, स्पर्धा या सगळ्यामुळे तरुण पिढीपुढे आव्हाने जास्त आहेत. हे जरी खरे असले तरी कुठेतरी सुवर्णमध्य काढायची तयारी दोघांनी दाखवायला हवी. प्रत्येकाला अगदी मनासारखा जोडीदार-साथीदार मिळेलच असे नाही. मानपानाचा विचार केला तर वर पित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सुईपासून सर्व संसाराची मागणी केली जाते; परंतु सद्यपरिस्थितीत फक्त मुलगी द्या हो, अशी विणवणी वर पित्याकडून वधू पित्याकडे होताना दिसते. वधू पित्याकडून नोकरदार मुलांची मागणी केली जाते; परंतु ही मानसिकता बदलायला हवी. शेतकरी, व्यवसायधारक यामध्ये कर्तबगारी करुन दाखवणारी मुले आहेत. त्यामुळे मुलीला नोकरदारच हवा, ही मानसिकता बदलायला हवी.
 
राजू जाधव, मांगूर  जि.बेळगांव 
 
वाढती वाहने-जटील समस्या
 
दिवसेंदिवस वाढणार्‍या लोकसंख्येपेक्षा वाढणार्‍या वाहन संख्येने उग्ररूप धारण केले आहे. आणि ही सर्व वाहने रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चारचाकी वाहने पार्किंग मुळे रस्त्यांवर वाहन चालक असो किंवा पादचारी असो त्याला जीव मुठीत धरूनच रोजचा दैनंदिन प्रवास करावा लागतो. त्यात रस्त्यांवर डबल पार्किंग करून वाहने लावून वाहनचालक बिनधास्तपणे निघून जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडते. त्यात जे रस्ते रुंदीकरण केले आहेत त्यावर चारचाकी वाहनांनी सर्व ठिकाणी वाहनतळे करून हक्काची जागा रस्त्यांवर केली आहे. पार्किंगच्या जागेमुळे भांडणे, हाणामार्‍या, वाहनताळावरील पैशांसाठी होणारी लुटमार हे नित्याचे झाले आहे. रस्त्यांवर खरे तर चारचाकी वाहने पार्क करताना सम-विषम तारखांचे बोर्ड, माहिती फलक लावले पाहिजेत. सार्वजनिक वाहनतळांपेक्षा खाजगी वाहनतळे वाहने लावण्यासाठी दामदुपटीने पैसे वसुल करत आहेत. सार्वजनिक वाहनतळे ही समस्या कायमच राहणार आहे. पण रस्त्यांवर, रस्त्यांचा कडेला अनेक बेवारस वाहने पडलेली असतात. या वाहनांची विल्हेवाट प्रशासनाने लावली पाहिजे. नवीन वाहनतळे उपनगरात सुद्धा नव्याने बांधण्याची गरज आहे. शहरात कोणत्याही गल्लीबोळात जा वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आहेच.! ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने नवीन वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. 
 
अनिल अगावणे, पुणे.
 
पाकिस्तानची कुटील नीती
 
पहलगाम येथील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संताप आणि चीड व्यक्त होत आहे. अल्पसंख्याक समाज हा देशद्रोही असून त्यांच्यावर बहिष्कार घाला, असा टोकाचा विचार काहीजण समाज माध्यमांत व्यक्त करत आहेत. असा विचार करणार्‍यांनी आधी या हल्ल्यामागची पाकिस्तानची रणनीती समजून घ्यायला हवी. अतिरेक्यांकडून थेट हिंदूंना लक्ष करण्यामागे कुठेतरी त्यांच्या डोक्यात हे गणित आहे, की जर हिंदूंवर हल्ला केला, तर भारतातील हिंदू संतापून आपल्याच देशातील अल्पसंख्याक समाजावर सुड उगवण्यास प्रवृत्त होतील. भारतातील बहुसंख्याक हिंदू संताप आणि नैराश्यातून अल्पसंख्याकांवर तुटून पडतील. परिणामी दोन्ही समाजात दंगली होऊन भारतात गृहयुद्ध पेटेल. पाकिस्तानची ही रणनीती यशस्वी न होऊ देण्याची जबाबदारी दोन्ही समाजाची आहे. दोन्ही समाजाने सामंजस्याने राहून पाकिस्तानची ही कुटील रणनीती मोडीत काढायला हवी. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles