अवकाळी पावसाने बाजरी आणि कांदा पिकाचे नुकसान   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यात विविध गावांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले बाजरी पीक शेतात जमीनदोस्त झाले. तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
 
मंचर, घोडेगाव, कळंब, महाळुंगे पडवळ, रांजणी अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, लाखनगाव, देवगाव, काठापुर, पारगाव, निरगुडसर इत्यादी गावात उन्हाळी बाजरीची लागवड करत असतात. सध्या उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी सातशे ते आठशे रुपये देऊन बाहेर गावावरून मजूर बाजरी काढणीला बोलावले असून, अनेक शेतकर्‍यांनी शेतातच बाजरी काढून ठेवली आहे. बाजरी करण्यासाठी वेळेत मशीन मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.१०० किलो बाजरीचे पोते ३२०० रुपये प्रतवारीनुसार इतका बाजार भाव एका पोत्याला मिळत आहे. परंतु शेतातील बाजरी पावसाने भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उन्हाळी उत्पादन घेतले जात आहे. जोडप्याला दोन वेळचे जेवण एक हजार ते बाराशे रुपये रोज देऊन कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली असून अनेक शेतकर्‍यांनी शेतातच कांदा ठेवला आहे. पावसामुळे कांदा पूर्णपणे भिजल्याने शेतकर्‍यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

Related Articles