पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ   

 

भारतावर आतापर्यंत १५ लाख सायबर हल्ले 
 
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, भारतावर १५ लाख सायबर हल्ले झाले आहेत, जे भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले. फक्त १५० सायबर हल्ले यंत्रणेला थांबवता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातून करण्यात आले.
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धबंदी असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या संकेतस्थळांना लक्ष्य करत आहेत. बांगलादेश आणि पश्चिम आशियातूनही सायबर हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्र सायबर अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.
 
सायबर कार्यालयाने दावा फेटाळला
 
महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने हॅकर्सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरल्याचे, विमान वाहतूक, महानगरपालिका यंत्रणेत घुसखोरी केल्याचे, तसेच निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचे दावे फेटाळून लावले.
 
शस्त्रसंधीनंतर भारतातील हल्ले झाले कमी 
 
महाराष्ट्र सायबर कार्यालय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येते. नोडल कार्यालय  जे सायबर गुन्ह्यांच्या तपास आणि सुरक्षा करते. तपासातून असे दिसून आले की भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, भारतातील सरकारी संकेतस्थळांवरील सायबर हल्ले कमी झाले आहेत. पण पूर्णपणे थांबलेले नाहीत, असे अधिकार्‍याने सांगितले.पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियाई देशांमधून हे हल्ले होत आहेत. महाराष्ट्र सायबर कार्यालयाने इंटरनेट माध्यमांवरील बनावट माहितीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. यात ८३ पैकी ३८ बनावट बातम्यांच्या पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सायबर सेलने तयार केलेला सायबर गुन्ह्यांवर जागरूकता वाढवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये अभिनेता शरद केळकर आणि अमीषा पटेल आहेत. जे वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल आणि नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध युक्त्यांबद्दल माहिती देत आहेत. नागरिकांनी सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  
 
कसे रोखायचे सायबर हल्ले?
 
ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी १९४५ आणि १९३० या क्रमांकावर फोन करावा. फोन आल्यानंतर, विश्लेषक कॉलरशी संपर्क साधतो. सुमारे १०० फोन लाईन्स एकाच वेळी काम करत आहेत. १९३० आणि १९४५ या दोन्ही क्रमांकांवर दररोज सात हजार कॉल येत आहेत. सायबर फसवणूक करणार्‍यांवर वेळेवर कारवाई करून, २०१९ पासून ६०० कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत २०० कोटी रुपये वाचले आहेत.

Related Articles