पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी   

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत  दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीर याच मुद्दावर होईल, असे सोमवारी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या नावाखाली येणार्‍या धमक्यांना भारत भीक घालणार नाही, असा इशार मोदी यांनी यावेळी दिला. पाकिस्तानच्या वर्तनावरच त्यांच्याशी कसे वागायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
 
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत भारतीय लष्कराच्या विविध दलांनी दाखविलेल्या साहसपूर्ण कामगिरीचा गौरव केला. या कामगिरीत स्वदेशी शस्त्रांची चमक जगाने पाहिली. भारत एकजुटीने या कारवाईत उभा राहिला. एकता हीच आमची शक्ती आहे. ही वेळ युद्धाची नाही तशी दहशतवादाचीदेखील नाही, असेही मोदी म्हणाले.
 
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. मात्र, हाच दहशतवाद त्या देशालाही संपवेल, असा इशारा मोदी यांना दिला.मोदी पुढे म्हणाले, पाकिस्तानला वाचायचे असेल तर दहशतवाद मुळापासून उखडला पाहिजे. याबाबतीत भारताची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकावेळी चालू शकत नाही. तसेच, पाणी आणि रक्तदेखील एकत्र वाहू शकत नाही.
 
भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान बचावासाठी जगभर याचना करत फिरला. परंतु, कोणीही त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे, त्यांच्या लष्करी अधिकार्‍यांनी १० मे रोजी भारताच्या लष्करी अधिकार्‍यांना दूरध्वनी केला. तोपर्यंत आम्ही दहशतवादाच्या पायाभूत आणि कट्टर दहशतवाद्यांनाही संपविले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ भग्नावशेष झाले. पाकिस्तानच्या याचनेनंतर आम्ही लष्करी हल्ले थांबवले असले तरी पाकिस्तानने आगळीक केल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत आम्ही जशास तसे उत्तर देऊ. भारताची तिन्ही दले, सीमा सुरक्षा दल, निमलष्करी दले सज्ज आहेत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकनंतर आता ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताचे धोरण आहे, असेही मोदी म्हणाले.
 

Related Articles