राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट   

 

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के निकाल  

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. तो ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 98.82 टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे. 
 
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील २३ हजार ४८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत ९२.३१ टक्के मुले, तर ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ ने जास्त आहे. यंदाही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याला निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के लागला. 
 
गोसावी म्हणाले,दहावीच्या परीक्षेतही कॉपीमुक्‍त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यात ३७ केंद्रांवर गैरप्रकार घडले. आता तपासणी, चौकशी करून संबंधित केंद्रांपैकी दोषी केंद्रे कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या अभियानामध्ये भरारी पथके, बैठी पथके, आकस्मिक भेटी अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 
 
निकाल दृष्टिक्षेपात...   
 
एकूण नियमित विद्यार्थी - १५ लाख ५८ हजार २०
परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी - १५ लाख ४६ हजार ५७९
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी - १४ लाख ५५ हजार ४३३
नोंदणी केलेले खासगी विद्यार्थी - २८ हजार ५१२
परीक्षा दिलेले खासगी विद्यार्थी- २८हजार २०
उत्तीर्ण झालेले खासगी विद्यार्थी - २२ हजार ५१८
उत्तीर्णतेची टक्केवारी - ८०.३६ 
नोंदणी केलेले पुनर्परीक्षार्थी - २४ हजार ३७६
परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी - २३ हजार ९५४
उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी - ९ हजार ४४८ 
उत्तीर्णतेची टक्केवारी - ३९.४४  टक्के
नोंदणी केलेले दिव्यांग विद्यार्थी - ९ हजार ६७३
परीक्षा दिलेले दिव्यांग विद्यार्थी - ९ हजार ५८५
उत्तीर्ण झालेले दिव्यांग विद्यार्थी - ८ हजार ८४४
उत्तीर्णतेची टक्केवारी - ९२.२७ 
शंभर टक्के निकाल लागलेले विषय - २४
एनसीसी, क्रीडा, स्काऊट गाईडसाठी सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी - २ लाख ४६ हजार ६०२
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी - ४
एटीकेटी पात्र विद्यार्थी - ३४ हजार ३९३
पुनर्परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी - ८६ हजार ६४१

Related Articles