रामजन्म आणि बाळ लीला   

भावार्थ रामायणातील कथा : विलास सूर्यकांत अत्रे

दशरथाच्या तीनही राण्यांचे दिवस लौकिकदृष्ट्या भरले. त्यांच्या पोटी चार पुत्ररत्ने जन्माला येणार होती. ही चारही बालके भगवंताचा अवतार होते. ते सगळे अयोनिज जन्माला आले. महाविष्णूचा राम हा अवतार. त्याच्या आगमनाची, त्याला पहाण्याची, त्याच्या दर्शनाची, त्या योगे पावन होण्याची समस्त देवादिकांना खूप आस लागून राहिली होती. रामजन्माच्या वेळी अयोध्येच्या परिसरात देवदेवतांचे आगमन झाले होते. देवदेवतांनी अयोध्येच्या आकाशात प्रचंड दाटी केली होती. सूर्यवंशात हा अवतार घेणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी सूर्य मध्यान्ही येवून थांबला होता.
 
वसंत ऋतु, मधुमास, शुक्ल पक्ष, नवमी या मुहूर्तावर राम अवतार प्रगट झाला. राम अवतार प्रगट झाला. अतर्क्य असलेली माया, जगदंबा त्याच्या चरणाशी भुललेली होती. सनकादिक त्याच्या पायाशी आसक्त झाले होते. त्याच्या चरणतळाचे वर्णन वेदांना तसेच शेषालाही जमलेले नव्हते. त्याचे गुडघे अतिशय गोल होते, पोटर्‍या सरळ होत्या, मांड्या कर्दळीच्या स्तंभाप्रमाणे होत्या.
 
ब्रह्मदेवाने कधीकाळी आपला जन्मदाता विष्णू याचा शोध घेण्यासाठी क्षीरसागरात बुडी मारली होती आणि हजार वर्षे झाली तरी त्याला आपल्या जन्मदात्याचा थांग लागला नव्हता. तेव्हा श्री विष्णूने त्याला आश्वासून कमळात बसविले होते आणि चतु:श्लोकी उपदेश केला होता. त्याच्या हृदयाचे महिमान वर्णन करताना श्रुती शास्त्रांनाही मौन पडले. तेही मुके झाले. वेदांचा ओघ जिथून सुरू झाला असा शंखाप्रमाणे त्याचा कंठ होता. ‘ओम‘कारातील असलेले वर्ण जणू मुखातील दंतपंक्ती होत्या. चैतन्याचा देखणेपणा त्याच्या डोळ्यांपुढे शरण आला होता.
 
अशा पूर्ण पुरूष अवतारी रामाचे दर्शन घडताच कौसल्येची अवस्था वेगळीच झाली. ती अवती भवतीचे जग विसरली, ती देहभान विसरली, धर्मबिंदू तिच्या शरीरावर पाझरू लागले, डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले, तिचा आनंद तिच्या पोटात मावेनासा झाला, तिच्या वाचेला मौन पडले, शरीर कंपायनमान झाले, तिचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले होते. तिची भावसमाधीच लागली होती. हळूहळू ती भानावर येऊ लागली. तिची समाधी उतरली तिला देहभान आले होते. सावध झाल्यावर तिने या पूर्णपुरूषाला विनंती केली, ‘तू माझा बाळ आहेस, तू माझे लेकरू आहेस; पण या पूर्णपुरूषाच्या रूपात तू प्रगट झालास तर पौरजन तुला माझा पुत्र मानणार नाहीत. तू माझं छोटसं बाळ हो आणि बाळ होऊन माझ्या कुशीत ये‘. मायेच्या शब्दांची किती ताकद असते, ‘बाळ होऊन माझ्या कुशीत ये‘ हे मायेचे शब्द ऐकताच निमिशातच त्या पूर्णपुरूषाने नवजात अर्भकाचे रूप धारण केले, आणि ते बाळ आईच्या कुशीत विसावले. 
 
कौसल्येचे बाळ होऊन पाळण्यात खेळणार्‍या रामाच्या मनात विचार आला, ‘मी किती धनवान आहे, मी किती ऐश्वर्यवान आहे. क्षीरसागरात शेष शयनी असलेला मी, माझे पाय प्रत्यक्ष लक्ष्मी चुरत असते. माझे एवढे ऐश्वर्य असताना, माझे भक्त त्या सगळ्या ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करतात; पण माझ्या पायाचे क्षालन करून सांडणार्‍या पाण्यावर मात्र उड्या मारतात. त्याचे चरणामृत म्हणून आनंदाने सेवन करतात. चरणामृत मिळताच अन्य कोणतीही अपेक्षा त्यांना नसते. खरच या पायाचे क्षालन करून सांडणार्‍या पाण्यात काय गोडी आहे? चाखून पहायला हवी‘ असे म्हणून त्या बाळाने आपल्या चरणकमळाचा अंगठा हातात धरला, आणि तो अंगठा हातात घरून तोंडात घातला. तो पायाचा अंगठा तोंडात धरला त्या बरोबर प्रत्यक्ष परमेश्वराला आपल्या चरणांमृताची काय गोडी आहे हे समजले. त्या गोडीमुळे तोंडात धरलेला पायाचा अंगठा त्याने बाहेर काढलाच नाही. लहान बाळ हे परमेश्वराचा अवतारच असते. म्हणून रामाचे तेच लक्षण अद्यापीही प्रत्येक बाळापाशी दिसून येते. सगळी लहान बालके, जन्मानंतर आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालून आनंदाने चोखत असतात आणि परमेश्वराच्या चरणांमृताची गोडी अनुभवत असतात.
 
तिकडे क्षीरसागरातून निघालेला शेष सौमित्रेच्या उदरीचा गर्भ झाला होता, आणि तो रामाचा पाठचा भाऊ सौमित्र झाला. शेषाने लक्ष्मण म्हणून अवतार घेतला. कैकयीला मात्र जुळी मुले झाली. तिला मिळालेल्या पायसमध्ये रामाचा एक भाग होता आणि लक्ष्मणाचा एक भाग होता. ते दोघेही विष्णू आणि शेष यांचेच अवतार होते. कैकयीला जुळी मुले झाली; पण त्यांच्या जन्मानंतर तिला अनावर झोपेने घेरले होते. तिला मुलांच्या जन्माचा आनंद झाला नव्हता. आई झाल्याचा आनंद झाला नव्हता. बाळांना कुशीत घ्यावे असेही वाटले नव्हते. तिचे मन वात्सल्य प्रेमाने भरूनही आले नव्हते.
 
दशरथाने पुत्रप्राप्तीनंतर खूप दान धर्म केला. सवत्स गोदान केले, अश्व, रथ, गज, धन सगळ्याचेच दान केले. मुलांचे जातक कर्म केले. त्याला झालेल्या चार पुत्रांमुळे जणूकाही त्याने चारी पुरूषार्थ साधले. सकळ जगाचा जो निजविश्राम जो निष्कामाचा पूर्ण काम, असा तो श्रीराम. जो सर्व लक्षणांनी परिपूर्ण तो लक्ष्मण. भवशत्रुंचे निर्दालन करणारा शत्रुध्न आणि भरत या सार्‍यांचे नामाभिधान वसिष्ठांनी केले. धन्य धन्य तो वाल्मिकी आणि ही रामकथा सांगणारी त्याची वाचा. आता या पुढे त्याने सांगितलेली  रामकथा ऐकतच राहावी अशी अगाध आणि अनुपम्य आहे.  
 
श्रीरामाचा जन्म झाला. त्याच वेळी लंकेत अशुभ घटना घडल्या होत्या. त्याच्या जन्मानंतर लंकेवर वीज पडली, भूकंप झाले, अशा नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. रावण सिंहासनावर विराजमान होण्यास गेला, तेव्हा त्याचा मुगुट पायाशी पडला. कुंभकर्णाच्या दारी घुबडांनी घूघूत्कार केला होता. इंद्रजित आरश्यात स्वत:चे रूप पहाण्यास गेला असता त्याला त्याचे धडावर शीर दिसले नव्हते. मंदोदरीच्या गळ्यातील गळसरी तुटून आगीत पडली आणि जळून गेली होती. अशा अनेक अशुभ घटनांनी आणि संकेतांनी लंकेला आणि लंकाधीशाला त्रस्त केले होते. आपला आणि लंकेचा लवकरच घात होणार आहे, अशी रावणाला मनोमन भीती वाटू लागली होती. 

(आधार - संत एकनाथकृत भावार्थ 

रामायण बालकांड अध्याय ७)

Related Articles