वाचक लिहितात   

विकासाचा समतोल हवा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य देशात आज सर्वात अग्रेसर राज्य आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारांनी राज्याचा विकास करण्यास सुरुवात केली खरी; परंतु त्यात अजून बरेच काही बाकी असल्याचे दिसून येत आहे. मुंबईजवळील शहरे, उपनगरे आणि नजिकच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या, तो सारा परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला आहे; मात्र मुंबई परिसराचा सुनियोजित विकास होत असताना उर्वरीत महाराष्ट्रावर काहीसा अन्याय झाल्याचे जाणवते. राज्यात शुद्ध पाणी पुरवठा करण्यात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. राज्यात शेतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत. शेती समस्यांना कंटाळून शेतकरी बांधव आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग एकंदरीत प्रगतीच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहेत. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग बांधून तयार झाला; मात्र मुंबई-गोवा महामार्ग गेल्या तपभराहून अधिक काळ पूर्णतेच्या समस्यांत अडकवून ठेवला आहे. प्रभावी लोकप्रतिनिधी व मंत्री महोदयांनी आपापल्या मतदारसंघांत विकासकामांचा धडाका लावला आहे. त्याचवेळी विरोधक आणि इतरांच्या मतदारसंघांत विकास, सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे ध्यानात येते. अशा प्रकारचा असमतोल विकास हा राज्याचा विकास अधुरा ठेवला जात आहे. 

राजन पांजरी, जोगेश्वरी.

पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखा

राज्यात तीव्र पाणी टंचाई आहे. गावोगावी विहिरीतून, धरणातून पाणी जमा करून टँकरद्वारे टंचाईग्रस्त ठिकाणी नागरिकांना पोहचविण्यात येत आहे. काही ठिकाणी विहिरीत पाणी सोडून तेथून नागरिक पोहर्‍याने काढून पिण्यासाठी वापरत आहेत. हे विविध ठिकाणचे संकलित पाणी पिण्यासाठी शुद्ध असेलच असे नाही, म्हणून प्रशासन व नागरिकांनी हे पाणी शुद्ध करून, गाळून किंवा तापवून थंड करुन प्यावे. या पाण्यात शुद्धीकरण ड्रॉपही टाकावे म्हणजे नागरिकांना पिण्यास ते योग्य व निर्जंतुक असेल.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

एकोप्याची भावना दिसावी

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली. देशाच्या संकट काळात देशाच्या शत्रूंविरुद्ध सर्व देशवासीयांची एकोप्याची भावना दिसावी, अशी अपेक्षा असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उचित नाही.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई 

आगळीक करू नका

‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारतीय हवाई दल, लष्कर आणि भारत सरकार व समस्त भारतीय नागरिकांचे मनस्वी कौतुक! इथून पुढे तरी पाकिस्तानने चादर पाहून पाय पसरायला हवे. ’ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून पाकिस्तानचे नाक तर कापलेच; पण दहशतवादी मसूद असो वा त्याला पोसणार्‍या पाकिस्तानने आता आगळीक करता कामा नये असा धडा दिला.

सत्यसाई पी.एम, गेवराई (बीड) 

पक्षांतराचे फायदे

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीतील मातब्बर साखर कारखानदारांनी आजवर प्रत्येक निवडणुकीत या पक्षातून त्या पक्षात उड्या मारलेल्या आहेत. जो पक्ष सत्तेवर व प्रबळ असेल आणि तिकीट मिळण्याची संधी असेल तेथे पक्षांतर करायचे. मग विचारसरणी दुय्यम! भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनेक वर्षे काँग्रेसची हवा महाराष्ट्रात होती. शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते; मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करायला हाच मुहूर्त थोपटे यांना सापडला. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, विखे पाटील हे सर्व साखर कारखानदार आहेत व त्यांनी वेळोवेळी पक्ष बदलला आहे. हे आमदार साखर कारखान्यांचे हित सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असतात व पक्ष बदलतात, सत्तेत सहभागी होतात. प्रसंगी मंत्रीपद मिळवतात. त्यांचे राजकारण साखर कारखान्याभोवती फिरत असते. 

गिरीश भागवत, यशवंतनगर, तळेगाव

पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती!

राज्यातील पारा जसा वाढत चालला आहे, तसाच राज्यातील पाणी साठा कमी होत चालला आहे. राज्यातील पाणी साठा कमी होत चालल्याने राज्यात सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव आणि विहिरींनी तळ गाठला आहे. राज्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. ग्रामीण भागात तर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने त्यावर तोडगा म्हणून टँकरची सोय केली आहे. शहरातील काही भागात अजूनही २४ तास पाणी उपलब्ध असते. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत २४ तास पाण्याची चंगळ आपल्याला परवडणारी नाही. प्रशासनाने २४ तास पाणी सोडण्याऐवजी दिवसातील काही तास पाणी सोडावे. त्यामुळे शहरातील लोकांना पाणी बचतीची सवय लागेल. पाणी टंचाईवर पाण्याची बचत हाच उपाय आहे.

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles