वाचक लिहितात   

भाजप स्वबळावर लढणार?

नुकतेच भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवस महाराष्ट्र दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी नवीन डाव टाकून दिल्ली गाठली. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे निर्देश दिले. भारतीय जनता पक्षासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. २०१४ आणि २०१९ आणि त्यानंतर सलग तिसर्‍यांदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात अभूतपूर्व आणि घसघशीत असे यश मिळाल्यापासून भाजपचे मनोबल उंचावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजपसारख्या केडरबेस पक्षासाठी त्याचप्रमाणे पक्ष संघटनेचे स्थानिक पातळीवर अधिक बळकटीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यादृष्टीने पावले टाकत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला किमान निवडणुका तरी स्वबळावर लढवण्याची इच्छा आहे. आगामी निवडणुकीसाठी अमित शहांचा हा नवा डाव कितपत यशस्वी होतो, ते पहाणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे!

राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  

कलाकारांची वक्तव्ये चुकीची

पहलगाम हल्ल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दहशतवाद्यांच्या रडारवर केवळ देशातील बहुसंख्य समाज आहे आणि देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर जनतेमधील स्वराष्ट्राप्रतीचे प्रेम वाढते आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ प्रसारित झाला होता, ज्यामध्ये आघाडीचे कलाकार पाकिस्तानचे मुक्त कंठाने कौतुक करताना दिसत होते. ज्या भारताकडून त्यांना प्रेम, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळाली, त्याच्या शत्रुराष्ट्राच्या बाजूने काही विधान केले तर आपल्याला जे मिळाले आहे ते सर्व हिरावून घेतले जाईल ही भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. ज्या व्यक्तींचे अनुकरण अनेकजण करतात, मग त्या व्यक्ती राजकारणी असो, चित्रपट सृष्टीतील असो किंवा अन्य क्षेत्रातील त्यांनी त्या देशाशी एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे.

लीना गाडगीळ, पनवेल

मंत्र्यांचे बेगडी मराठी प्रेम 

मध्यंतरी शाळांमधून हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून राज्यात बरेच मोठे वादळ माजले होते. बरीच मत मतांतरे व्यक्त केली जात होती. हिंदीवरून मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला अडचणीत आणले होते; परंतु अचानक त्यांनी त्यावर सारवासारवी करून स्वतःला वाचवण्याची केविलवाणी धडपड केली. मी मराठी बोलतो; पण मीरा-भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषक आहेत. त्यामुळे तिथे हिंदी बोलावे लागते. हे त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. याचा अर्थ उघड आहे की, त्यांना मराठी भाषेविषयी आत्मीयताच  नाही. नाही तर मंत्री असून देखील त्यांनी तिथल्या जनतेशी मराठीत संवाद साधण्याऐवजी हिंदीत संवाद साधला नसता.

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई.

कोरोनाबाबत सतर्कता हवी!

जागतिक महामारी असलेला कोरोना व्हायरस पुन्हा आपले हातपाय पसरू लागला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरातील कोरोना रूग्ण संख्या ४ हजारांवर पोहोचली आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली यासह इतर राज्यात देखील कोरोना रूग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संतोष शिंदे, मु.पो.काष्टी, ता.श्रीगोंदा

मुंबईच्या पाणीसाठ्यात घट

एकीकडे राज्याच्या कानाकोपर्‍यात तुफान बरसलेल्या अवकाळी पावसामुळे या वर्षी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा जून-जुलै अगोदरच वाढण्यास सुरुवात झाली असताना मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणी साठ्याची पातळी मात्र धरण क्षेत्रातील अपुर्‍या पावसामुळे खालावली आहे. धरणांत फक्त १३ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्यास, ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात दररोज निरनिराळ्या कारणांमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊन पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढत चालले आहे. मुंबई शहरात पाणी गळतीचे आणि पाणी चोरीचे प्रमाण २५ टक्के इतके प्रचंड आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

Related Articles