कंदहार विमान अपहरणातील सूत्रधार रौफ असगरचा खात्मा   

इस्लामाबाद : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ रौफ असगरचा खात्मा झाला. १९९९ सालच्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार होता. 
 
भारतीय सैन्याच्या हल्ल्यात मसूद अझर यांच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाल्याने जैश ही दहशतवादी संघटना पूर्णतः बिथरली होती. रौफ असगर या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. रौफ असगर हा भारताचा मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. असगरने भारतीय एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाच्या अपहरणाची योजना आखली होती. या अपहरणामुळे भारत सरकारला मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर यांना सोडावे लागले.  
 
२४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. हे विमान नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीकडे निघाले होते. भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुमारे ४० मिनिटांनी पाच हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले.
 
विमानात १७९ प्रवासी आणि ११ कर्मचारी होते. अपहरणकर्त्यांनी विमानाला अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे उतरवले. दुबईमध्ये त्यांनी २७ प्रवाशांना सोडले आणि एका प्रवाशाची हत्या केली. शेवटी, विमान अफगाणिस्तानमधील तालिबान-नियंत्रित कंदाहार येथे उतरवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख, मुश्ताक अहमद झरगर  यांच्या सुटकेची मागणी केली होती. भारताच्या नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक अत्यंत गंभीर घटना होती.

Related Articles