‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच राहणार   

१०० दहशतवाद्यांचा खात्मा : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली. या कारवाईत किमान १०० दहशतवादी मारले गेले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नसून पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर, चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही राजनाथ म्हणाले.
 
‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस काँग्रेस, एआयएमआयएम, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह अन्य पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईस पाठिंबा दिला. तसेच, सशस्त्र दलाचे कौतुक केले. संकटाच्या क्षणी आम्ही सरकारसोबत आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीनंतर सांगितले. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि हितासाठी कारवाईसंर्दभात तपशीलवार प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे सांगितले.
 
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. कारवाई अजून सुरू असून आम्ही तपशील गोळा करत आहोत. पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर भारत योग्य उत्तर देईल, असेही ते म्हणाले.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीस सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली. पाकिस्तानविरोधातील कारवाईचे सर्वच पक्षांनी समर्थन केले असल्याचे सांगितले. 
 
या बैठकीत सशस्त्र दलाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. ते ऑपरेशन्समध्ये व्यस्त होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल सर्वच राजकीय नेत्यांनी सैन्य दलाचे कौतुक केले, असेही ते म्हणाले.एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल सशस्त्र दल आणि सरकारचे कौतुक केले. 
 

Related Articles