मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण   

मुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे

भगवान श्रीकृष्णाच्या प्रस्थानानंतर त्यांनी निर्माण केलेली द्वारका नगरी समुद्रात बुडाली, अशी पौराणिक कथा आहे. गोमती नदी जेथे सागराला मिळते तेथे ही नगरी वसलेली होती असे सांगतात. आता तेथे गोमतीच्या तीरावर श्रीकृष्णाचे मंदिर नव्याने वसलेली नगरी आहे. तेथे झालेल्या उत्खननात पुरातत्व विभागाला पुराणातील कथेला दुजोरा देणारे पुरावे मिळाले. या क्षेत्रातील अभ्यासकांनी आणखी संशोधन केले. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेल्याने द्वारका नगरी पाण्याखाली गेल्याचा वैज्ञानिक निष्कर्ष त्यांनी काढला. येणार्‍या काळात अभ्यासक आणखी काही अज्ञात बाबींवर प्रकाश टाकतील.
 
अचानक द्वारकेचा इतिहास का सांगितला जातो? असा प्रश्न स्वाभाविकच कोणालाही पडेल; पण इतरांप्रमाणे मुंबईकरांना या इतिहासाची आठवण दरवर्षी होते. किंबहुना ती येत राहील याची काळजी मुंबईचे कारभारी दरवर्षी घेतात. दरवर्षी ती जूनच्या शेवटाला किंवा जुलै महिन्यात होते. यंदा ती थोडीशी आधीच, म्हणजे मे महिन्यातच झाली. निसर्गाचे बदलणारे ऋतुचक्र, विकासाच्या नावाखाली मुंबई शहराची झालेली वाताहात यामुळे समुद्राला मागे ढकलून उभ्या राहिलेल्या शहराची स्थिती भविष्यात श्रीकृष्णाच्या द्वारकेसारखी होणार नाही ना? अशी भीती अनेकांच्या मनात चमकून जाते.
 
यंदा अपेक्षेपेक्षा दोन आठवडे आधीच महाराष्ट्रात पोचलेल्या मान्सूनने मागच्या सोमवारी मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अक्षरशः दाणादाण उडवून दिली. सरकार व महापालिका प्रशासनाने कितीही आणि काहीही दावे केले तरी पहिल्या पावसात मुंबई तुंबतेच, हा मागच्या काही वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबई तुंबणे किंवा जनजीवन ठप्प होणे हे मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहे; पण यंदा ते मे महिन्यात झाले आहे आणि मुख्य म्हणजे मोठा गाजावाजा करून पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरले. यामुळे भुयारी रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रथमच उपस्थित झाला. 
 
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा दिंडोरा पिटत असताना, देशाच्या आर्थिक राजधानीचे मागच्या आठवड्यातील चित्र फारसे भूषणावह नव्हते. सात बेटांना जोडणार्‍या खाड्यांमध्ये भराव टाकून, पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या नद्या, नाले गिळंकृत करून मुंबईची इंच आणि इंच जागा काबीज करण्यात आली आहे. समुद्रात भराव टाकून, समुद्राला मागे ढकलून नरिमन पॉईंट, कफ परेडसारख्या भागात टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या. मोकळी मैदाने, खाड्या आधी झोपड्यांनी व्यापल्या व नंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी तेथेही इमारती उभ्या राहिल्या. याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.

वेळेआधी आगमन

मुंबई किंवा राज्यातच नाही, तर देशभरात अनेक दशकांनंतर मे महिन्यात एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. देशभरात मे महिन्यात ४२ टक्के जास्त पाऊस झाला. मुंबईत तर तब्बल १०७ वर्षांनंतर मे महिन्यात एवढा विक्रमी पाऊस झाला. यापूर्वी १९१८ मध्ये मुंबईत २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. २६ जुलै २००५ ला मुंबईत जलप्रलय आला होता. त्यादिवशी तब्बल ९४४ मिमी (३७.१७ इंच) कोसळल्याने मुंबईत हाहाकार उडाला होता. दीड हजार लोकांचा बळी त्यात गेला होता. त्यावेळी प्रथमच दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्या तुलनेत केवळ २५ टक्के पाऊस होऊनही यावेळी दक्षिण मुंबईमधील कुलाबा, नरिमन पॉइंट, ओव्हल मैदान, चर्चगेट, सीएसएमटी या भागात पाणी साठले होते. 
 
मंत्रालय परिसरात, महापालिका मुख्यालयासमोर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने कर्मचार्‍यांना सुट्टी द्यावी लागली. सुदैवाने सायंकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आली; पण त्या दिवसाचा पाऊस एक गंभीर इशारा देऊन गेला आहे. २००५ च्या प्रलयानंतर मुंबईतील पावसाच्या पाण्याचा लवकर निचरा व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजना किती तोकड्या आहेत, याची जाणीव या पावसाने करून दिली आहे.

मेट्रो स्थानकात पाणी

बांद्रा-कुर्ला संकुल ते वरळी दरम्यानच्या भुयारी मेट्रोचे उद्घाटन दोनच आठवड्यापूर्वी झाले होते. या मार्गावरील मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने सध्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातील राजकारण बाजूला ठेवले तरी उपस्थित होणारे प्रश्न नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. वेळेच्या दोन आठवडे आधीच मान्सूनचे आगमन झाल्याने नियोजन कोलमडल्याचा प्रशासनाचा दावा चुकीचा नसेलही, पण ग्लोबल वॉर्मिंगचे असे अनेक परिणाम दिसू शकतात याची जाणीव ठेऊन पुढच्या काळात नियोजन करावे लागणार आहे. मान्सून एवढ्या वेगाने केरळातून महाराष्ट्रात कसा पोचला? मुळात हा पाऊस मान्सूनचा आहे, की पूर्व मान्सून म्हणजे वळवाचा आहे? याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात असली तरी त्या तात्विक आणि तांत्रिक चर्चेपेक्षा कधीही येणार्‍या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देण्याची सज्जता ठेवणे हाच यापुढे एकमेव मार्ग असणार आहे.

आरोपांचा गडगडाट!

अचानक आलेल्या पावसाने मुंबईचे बारा वाजल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मेट्रोच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला, लोकांच्या सुरक्षिततेकडे डोळेझाक करून स्वतःचे खिसे भरले. गैरव्यवहाराचा पैसा आमदार, नगरसेवक फोडण्यासाठी वापरला जातो, असे आरोप विरोधकांनी केले. गेली तीन वर्षेे मुंबई महापालिका भाजप आणि शिंदे गटाच्या हातात आहेत. जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट झाली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 
 
त्याआधी २५ वर्षे तुम्हीच महापालिकेत बसून मलिदा खात होता, असे उत्तर सत्ताधार्‍यांनी दिले. येणार्‍या निवडणुका बघता हे आरोप-प्रत्यारोप आणखी टोकदार होत जातील; पण त्या गोंधळात येणार्‍या जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मागच्या काही वर्षात झालेल्या माळीण, तळीयेसारख्या दुर्घटना, दरडी कोसळण्याची भीती असलेली गावे, मुंबईतील धोकादायक इमारती याबाबत खबरदारी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

ठाकरे गटात अस्वस्थता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार अशी कुजबूज गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. दोन्ही गटातील नेत्यांच्या काही विधानांमुळे यात भर पडली आहे. दोन्ही गटाकडून, विशेषतः शरद पवार गटाकडून याचे निःसंदिग्ध शब्दात खंडणही केले जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण तर आहेच; पण महाविकास आघाडीतही संभ्रम आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची जाहीर प्रशंसा करून त्यात भर घातली आहे. 
 
शरद पवार हे जय, पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. या वयातही शरद पवार काम करतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची प्रशंसा केली. त्याच कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचे अवमूल्यन झाल्याचेही सांगितले. आजच्या परिस्थितीत राजकारणात टिकायचे असेल, तर तडजोडी कराव्या लागतात अशी कबुली त्यांनी दिली. या तडजोडी येणार्‍या काळात आणखी किती पुढे जाणार याबद्दलचे कुतूहल वाढले आहे.
 
राष्ट्रवादीतल्या चुळबुळीमुळे शिवसेनेचा ठाकरे गट मात्र अस्वस्थ आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शरद पवार यांच्या खास मर्जीतले आहेत. अनेकदा त्यांचा उल्लेख शिवसेनेतील राष्ट्रवादी असा केला जातो. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना लागलेले सत्तेचे डोहाळे बघून ते चांगलेच संतापले आहेत. काही लोकांना सत्तेची तहान लागली आहे; पण तहान लागली म्हणून कोणी गटारातले पाणी पित नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च चपराक

सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत कानउघाडणी केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द करत असल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या आधी घाईघाईने निर्णय घेऊन अनेक प्रकल्पांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली होती. ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम मेघा इंजिनिअरिंगला बहाल करताना, एल अँड टी या प्रतिष्ठित कंपनीला निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले होते. 
 
या विरोधात एल अँड टी या कंपनीने आधी उच्च न्यायालयात आणि मग सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने प्राधिकरणाची बाजू योग्य ठरवली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाने मात्र या निविदा प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले होते. तुम्ही ही निविदा प्रक्रिया रद्द करता, की आम्ही आदेश देऊ? असा सज्जड दम भरल्याने एमएमआरडीएला माघार घ्यावी लागली आहे. इलेक्टॉल बाँडच्या प्रकरणात चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग या लाडक्या कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
 

Related Articles