...ही दहशतवाद्यांच्या अंताची सुरूवात '   

हिमांशी नरवाल यांची प्रतिक्रिया 

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या २६ जणांच्या कुटुंबियांनी जे दुःख, वेदना भोगल्या त्या वेदना आता पाकिस्तानमधील जनतेलाही कळतील.  कारण भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ही दहशतवाद्यांच्या अंताची सुरूवात आहे, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी दिली असून सैन्याचे आभार मानले आहेत.
 
हिमांशी नरवाल म्हणाल्या, मी हात जोडून दहशतवाद्यांना विनंती केली होती, माझे फक्त सहा दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. माझ्या पतीला सोडून द्या; पण त्यांनी दया दाखवली नाही. मोहिमेला सिंदूर नाव दिल्याबद्दल त्या म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर या नावाशी मी जोडले गेले आहे. कारण सहा दिवसांत मी माझा जोडीदार गमावला. कोणालाच कल्पना नाही की, माझ्या मनावार किती मोठा आघात झाला आहे. पहलगाम हल्ल्यात अनेकांनी आपली मुले, काहींनी आपले पती, वडील गमावले. मी आशा करते की, अशी घटना पुन्हा कोणाबरोबर घडू नये.
--

दुःख कमी होणार नाही, प्रत्युत्तराचे समाधान : हर्षद लेले 

मुंबई : भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे खुश आहे. दुःख कमी होणार नाही. मात्र, दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला याचे समाधान आहे. पाकिस्तान  सुधारणार नाही, त्यांच्यावर सातत्याने कारवाई करत राहिली पाहिजे. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. हिंदूंना मारणार्‍या या दहशतवाद्यांचा समूळ नाश झाला पाहिजे. मृत पर्यटकांच्या आणि बाबांच्या आत्म्याला या कारवाईने शांती मिळाली असेल, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षद लेले यांनी दिली. 
--

दहशतवाद्यांना आता आयुष्याची किंमत समजेल : प्रियदर्शिनी 

बालासोर : पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन सरकारचे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. जेव्हा मी माझ्या पतीच्या मृतदेहाजवळ होते, तेव्हा लष्कराच्या जवानांनी मला आश्वासन दिले होते की कारवाई  करू. आज ते आश्वासन पूर्ण झाले आहे. दहशतवाद्यांना आता जीवनाचे मूल्य समजेल, अशी प्रतिक्रिया पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या ओडिशाचे प्रशांत सत्पथी यांच्या पत्नी प्रियदर्शनी आचार्य यांनी दिली. 
 
प्रियदर्शनी म्हणाल्या, मी आनंदी आहे, कारण आता दहशतवाद्यांना समजेल की मानवी जीवन किती मौल्यवान आहे. माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ गेले नाही. दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकले. आता त्यांना योग्य शिक्षा मिळाली आहे. माझा नवरा परत येऊ शकत नाही; पण जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असे हल्ले पुन्हा कधीही होऊ नयेत. दहशतवाद केवळ भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून संपला पाहिजे जेणेकरून लोक या पृथ्वीवर निर्भयपणे जगू शकतील.
--

माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळाली : इशान्या 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, त्याबद्दल मी  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. मी खूप लहान आहे, पंतप्रधान मोदींना मी काय सांगणार?; पण मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो सार्थ ठरवला. 
 
मी खरोखरच त्यांची ऋणी आहे. शुभम द्विवेदी आज जिथे कुठे असतील, तिथे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, अशी प्रतिक्रिया शुभम द्विवेदीच्या पत्नी इशान्या यांनी दिली आहे.
 

Related Articles