मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो   

थरूर यांचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली : भारताने दहशतवादी हल्ल्यांना दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल मी बोललो. मोदी सरकारचे समर्थन करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मात्र, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करून माझ्यावर स्वपक्षीयांनीच टीकेची झोड उठवली आहे, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. 
 
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या जागतिक दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून थरूर पाच देशांमध्ये बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. थरूर यांनी मंगळवारी २०१६ च्या उरी सर्जिकल स्ट्राईक, २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी पनामामध्ये भारत सरकारचे कौतुक केले होते. अलिकडच्या काळात भारताचा दहशतवादाविरुद्धचा दृष्टिकोन बदलला आहे. हे आधी घडले नव्हते, असे त्यांनी म्हटले होते. 
 
दरम्यान, थरूर यांचे वक्तव्य मोदी सरकारच्या समर्थनार्थ असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनीच थरूर यांच्यावर टीका केली आहे. त्यावर थरूर यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानामुळे संतापलेल्या धर्मांधांना मी हे सांगू इच्छितो की, मी केवळ दहशतवादी हल्ल्यांच्या बदल्याबद्दल बोलत होतो, भूतकाळातील युद्धांबद्दल नाही; पण नेहमीप्रमाणे माझे शब्द चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले.’ 
 

Related Articles