एअर स्ट्राईक पेक्षा देशात कोंबिंग ऑपरेशन करा; युद्ध हे उत्तर नाही...   

राज यांचा वेगळाच सूर

मुंबई,  (प्रतिनिधी) : ‘ऑपरेशन सिंदूर’ची देशभर प्रशंसा होत असताना व विरोधकांनीही त्याचे स्वागत करत सरकारला पाठींबा दिलेला असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र वेगळाच सूर लावत केंद्र सरकारला बोचकरे काढले आहेत.  युद्ध हे दहशतवादी हल्ल्याचे उत्तर नसते. एअर स्ट्राईक हे ही हल्ल्याचे उत्तर नाही. तर देशांतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश त्याला आणखी काय बरबाद करणार? असा सवाल ही त्यांनी केला.
 
भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असताना राज यांनी मात्र केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील तसेच एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा आधीच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्वीन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले होते. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
 
ते म्हणाले, पहलगाम सारख्या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करत शोधून काढले पाहिजे. एअर स्ट्राईक करून लोकांचे लक्ष विचलित करणे किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही. 
 

Related Articles