संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले   

पंतप्रधानांना लिहिले पत्र

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी  संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी स्वाक्षरी केली आहे.
 
या संदर्भातील बैठकीस काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि शिवसेना (ठाकरे) यासह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे जयराम रमेश आणि दीपेंद्र हुडा, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांचा समावेश होता. करुणानिधी यांच्या जयंतीमुळे द्रमुक नेते बैठकीस उपस्थित नव्हते. मात्र, पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रावर द्रमुख खासदारांची स्वाक्षरी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय (एम), आययूएमएल, सीपीआय, रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), विदुथलाई चिरुथैगल कच्ची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय (एमएल) लिबरेशन या पक्षांनीही या पत्रावर स्वाक्षरी केली आहे, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.  ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेला आम आदमी पक्षाचा (आप) एकही नेता बैठकीस उपस्थित नव्हता. मात्र, ‘आप’कडून पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र लिहिले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेदेखील (शरदचंद्र पवार) एकही नेता बैठकीस उपस्थित नव्हता. पहलगमाम हल्ल्यापासून विरोधकांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली जात आहे. 
 
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. 
 

Related Articles