बारावीचा निकाल ९१.८८ टक्के   

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के लागला. दरवर्षीप्रमाणेच, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल दीड टक्क्यांनी घटला. कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के तर, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८९.४६ टक्के निकाल लागला. राज्यातील ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. यंदा कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम निकालात दिसून आला.
 
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाचे सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते. मागील वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. यंदा निकालात घट पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे, यंदाही मुलीच अव्वल आल्या. यंदा ९४.५८ टक्के मुली, तर ८९.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या. यंदा १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. सुमारे २२ हजार ३१७ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, ४६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, ७४ हजार १७२ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले.
 
जेईई, नीटसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, यासाठी यंदा परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली, असे शरद गोसावी यांनी यावेळी सांगितले. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. त्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या, असेही ते म्हणाले. 
 
निकाल दृष्टिक्षेपात 
 
एकूण नियमित विद्यार्थी : १४ लाख २७ हजार ८५
परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी : १४ लाख १७ हजार ९६९ 
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी : १३ लाख २ हजार ८७३  
नोंदणी केलेले पुनर्परीक्षार्थी : ४२ हजार ३८८ 
परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी : ४२ हजार २४ 
उत्तीर्णतेची टक्केवारी : ३७.६५ 
नोंदणी केलेले दिव्यांग विद्यार्थी : ७ हजार ३१० 
परीक्षा दिलेले दिव्यांग विद्यार्थी : ७ हजार २५८ 
उत्तीर्ण झालेले दिव्यांग विद्यार्थी : ६ हजार ७०५  
उत्तीर्णतेची टक्केवारी : ९२.३८ 
नोंदणी केलेले खासगी विद्यार्थी : ३६ हजार १३३ 
परीक्षा दिलेले खासगी विद्यार्थी : ३५ हजार ६९७ 
उत्तीर्ण झालेले खासगी विद्यार्थी : २९ हजार ८९२
उत्तीर्णतेची टक्केवारी : ८३.७३ टक्के 
एनसीसी, क्रीडा, स्काऊट गाईडसाठी सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी : २० हजार ९४३ 
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी : १३७ 
प्रतिबंधित केलेले विद्यार्थी : १३० 
 
शाखानिहाय निकाल 
 
विज्ञान                           : ९७.३५ टक्के 
कला                             : ८०.५२ टक्के 
वाणिज्य                         : ९२.६८ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम        : ८३.२६ टक्के  
आयटीआय                    : ८२.०३ टक्के 
 
बारावीच्या १२४ परीक्षा केंद्रांची मान्यता धोक्यात
 
राज्यात बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार घडलेल्या १२४ केंद्रांची मान्यता धोक्यात आली आहे. या केंद्रांवरील ३६७ गैरप्रकारांची पडताळणी आणि सुनावणी घेऊन दोषी आढळणार्‍या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी दिली. 
 
राज्यात यंदा बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बैठे पथक, भरारी पथक, महिला पथक, विशेष भरारी पथक, आकस्मिक भेटी, परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण, ड्रोनद्वारे देखरेख अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. तसेच, गैरप्रकार होणार्‍या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला होता. राज्यात १२४ केंद्रांवर परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले. त्यात पुणे विभागातील २५ परीक्षा केंद्रांवर ४५, नागपूर विभागातील १९ केंद्रांवर ३३, छत्रपती संभाजीनगर विभागातील ४४ केंद्रांवर २१४, मुंबई विभागातील पाच केंद्रांवर नऊ, कोल्हापूर विभागातील तीन केंद्रांवर सात, अमरावती विभागातील १० परीक्षा केंद्रांवर १७, लातूर विभागातील ११ परीक्षा केंद्रांवर २९, नाशिक विभागातील सहा परीक्षा केंद्रांवर १२, तर कोकण विभागातील एका परीक्षा केंद्रावर एक गैरप्रकार उघडकीस आला.
 
विभागनिहाय टक्केवारी 
 
पुणे                             : ९१.३२ 
नागपूर                         : ९०. ५२ 
छत्रपती संभाजीनगर       : ९२.२४
मुंबई                          : ९२.९३
कोल्हापूर                    : ९३.६४
अमरावती                   : ९१.४३ 
नाशिक                       : ९१.३१
लातूर                         : ८९.४६
कोकण                       : ९६.७४

Related Articles