स्पर्धा परीक्षार्थींनी केवायसी करावी; एमपीएससीचे निर्देश   

पुणे : भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार व इतर पद्धतीने ’केवायसी’ करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी जर उमेदवाराने ’केवायसी’ पडताळणी केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिले आहेत.
 
एमपीएससीच्या सूचनेनुसार, उमेदवारांना आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये प्रथम नोंदणी करणार्‍या उमेदवाराला मोबाईल नंबर तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आधार आधारित ओळख पडताळणीच्या व्यवस्थेमुळे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
अर्ज करण्याकरिता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर एक वेळची नोंदणी करावी लागते. तसेच नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये अर्हते संदर्भातील विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरिता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदविण्याची पद्धती व सुविधा मार्च २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. 
 
भरती प्रक्रियांच्या विविध टप्प्यांवर उमेदवाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छा तत्त्वावर आधार अधिप्रमाणीकरणाचा वापर करण्याकरिता विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्यता दिली आहे. तसेच, राज्य शासनाकडून भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्त्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी एमपीएससीला प्राधिकृत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Related Articles