कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई   

अवकाळीच्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

मुंबई, (प्रतिनिधी) : मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांत उभ्या पिकांप्रमाणेच कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे काल राज्य  मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात  पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.  त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीचा मुद्दा  उपस्थित केला. त्यावर  फडणवीस यांनी कापणी झालेल्या पिकाची  भरपाई विचाराधीन असल्याचे सांगितले.
 
वन मंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकास मंत्री नीलेश राणे यांनी पावसामुळे सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे, तरी मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी मदत आणि  पुनर्वसन विभागाला यावर प्रस्ताव सादर करण्याची सूचना  केली.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पावसामुळे रस्ते आणि छोट्या पुलांचे नुकसान झाले आहे. त्यांची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी केली. ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सूचना द्याव्यात,  अशी मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. यावर गेल्या १५ दिवसांत ज्या भागात ‘रेड अलर्ट’ घोषित केला होता तेथील रस्ते आणि पूल दुरुस्ती बाबत विचार केला जावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
 
या बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी  तातडीने मदतीकरिता निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, ४९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी, पुणे विभागास १२ कोटी, नाशिक विभागास पाच कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास १२ कोटी, अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण ४९ कोटी वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती सेठी यांनी दिली.
 
त्याचबरोबर खरीप २०२५ आणि यापुढील कालावधीसाठी  केंद्र सरकार  अथवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची भरपाई दर आणि निकष २७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहतील. यामुळे १ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचना रद्द  करण्यात आल्या आहेत, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.
 
दरम्यान, बैठकीत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयात १४.५ टीएमसी,  जायकवाडी धरणात २८ टीएमसी तर गोसीखुर्द धरणात ३.७२ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती दिली.  तर राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पाणी  पुरवठा करण्याच्या गावांच्या संख्येत २०० ने तर टँकरच्या  संख्येत ३३६ ने घट झाली आहे. 
 

Related Articles