चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू   

चंद्रपूर : घनदाट जंगलात बांबूच्या काडया, सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर ५२४ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली. या घटनेने चिरोली, टोलेवाही, भगवानपूर येथे खळबळ उडाली. परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
 
संजीवनी संजय मॅकलवार (वय ४५, रा. चिरोली) असे तिचे नाव आहे.  महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते. चिरोली, टोलेवाही पासून तीन चार किमी अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे. त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनीवर हल्ला करून जागीच ठार केले. पतीने आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले. तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी गतप्राण झाली होती.
 
घटनेची माहित मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. बोथे, वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे, सिंघण, टोलेवाही येथील पोलिस पाटिल संगिता चल्लावार, चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम, प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले. मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला.

Related Articles