पंतप्रधानांनी युद्धातून माघार का घेतली?   

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

पुणे : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने युद्धजन्य परिस्थितीत आक्रमक भूमिका कायम ठेवली असती, तर दहशतवाद कायमचा संपुष्टात येऊ शकला असता. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्ध थांबवण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी घेतली आहे का, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच देशातील जनतेने या सरकारला जाब विचारण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
आंबेडकर म्हणाले, भारत-पाक संघर्षाच्या वेळी एकही आंतरराष्ट्रीय देश उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. अगदी राफेल विमाने पुरवणार्‍या फ्रान्सनेही आपली बाजू घेतली नाही. हे चिंतेचे असून, यावर देशात गंभीर चर्चा व्हायला हवी. पाकिस्तानमध्ये एकूण ९१ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत, त्यापैकी केवळ ९ केंद्रे नष्ट करण्यात आली. उर्वरित केंद्रे अद्याप अस्तित्वात आहेत, हे पाकिस्तान स्वतः सांगतोय. त्यांच्याकडे फक्त दहा दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा होता, तरीही आपण लढाई थांबवली. ही जिंकलेली लढाई आपण का हरलो, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा.
 
ते पुढे म्हणाले, या युद्धात काही भारतीय जवान शहीद झाले. त्यामध्ये मुंबईतील एका अग्निवीराचा समावेश आहे. मात्र, अग्निवीरांना शहिदाचा दर्जा न दिल्यामुळे त्याच्या कुटुंबाला सैन्याचे फायदे मिळाले नाहीत. यामुळे अग्निवीरांचे मनोबल खच्ची होत असून जवान आणि अग्निवीर यांच्यात तफावत निर्माण होत आहे. हा मुद्दा आम्ही पुढे आणणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles