वाचक लिहितात   

पब संस्कृतीला जनाश्रय आणि राजाश्रय
 
पुण्यातील कल्याणीनगर ’पोर्श’ अपघात प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या ’त्या’ काळरात्रीच्या कटू स्मृती अजूनही जाग्या असताना पुन्हा मद्यधुंद अवस्थेतील चालकाने १२ जणांना धडक दिल्याच्या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तथापि ’पोर्श’ घटनेनंतर मागे वळून बघितले तर स्थितीत काही बदल झाला; फरक पडला का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण ’पोर्श’ घटनेनंतर १९ मे २०२४ ते १५ मे २०२५ या कालावधीत पुणे शहरात ३३४ प्राणांतिक अपघातांपैकी २३१ अपघात हे ’हिट अँड रन’ प्रकारातील असल्याची आकडेवारी सांगते. यातही रस्ते अपघातातील जखमींना ’गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. उलटपक्षी ’हिट अँड रन’ अपघातास जबाबदार बेदरकार वाहनचालक जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन करीत असल्याचे वास्तव आहे. यातील बहुतांश अपघातात चालकाने मद्यप्राशन केलेले असणे, चालक अल्पवयीन असणे या समान बाबी आहेत. यावरून ’पोर्श’ घटनेनंतर व्यवस्थेने आणि नागरिकांनीही काही बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होते. सहाजिकच एवढ्या मोठ्या संख्येने होत असलेल्या सततच्या या रस्ते अपघातांना ब्रेक कधी लागणार, की नागरिकांनी जीव मुठीत धरून हे मृत्युचे सापळे चुकवत जगावे? असे प्रश्न यातून उपस्थित होतात. सध्या शहरात रूजत असलेली ’पब संस्कृती’ एक वेगळीच डोकेदुखी ठरली आहे. कारण शहरात फोफावलेल्या पब संस्कृतीत २५ वर्षांखालील तरूणांसह अल्पवयीन मुलांनाही सहज प्रवेश मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तथापि पबमध्ये नियमित पार्टी करण्याचा उच्चभ्रू लोकांमधील ट्रेन्ड आताशा स्वतःला सुसंस्कृत, पांढरपेशी म्हणवणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणांमध्ये देखील रूजत असल्याचे दिसते. विद्येचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी बिरुदावली मिरवणार्‍या पुणे शहरातील या ’पब संस्कृती’ला ’जनाश्रय आणि राजाश्रय’ मिळत असल्याचेच अधोरेखित होते.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
रस्त्याचे चुकीचे नाव
 
बेशिस्त वाहनचालकांवर एआयची नजर हे वृत्त वाचनात आले. (केसरी ३० मे) या वार्तांकनात रस्त्याचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता असे दिले आहे. यात रस्त्याच्या चुकीच्या नावाचा वापर केला आहे. पुणे महानगरपालिका ठराव क्रमांक ३४९ दिनांक १८/०९/१९४२ नुसार गुडलक रेस्टॉरंट नामदार गोखले चौक ते मरीआई गेट चौक या रस्त्याचे नाव ’नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ’ असे आहे. गोखले जन्म शताब्दी वर्षात तसे फलक या रस्त्यावर लावले आहेत. चुकीच्या नावाचा वापर केल्याने तेच नाव रूढ होते आणि महान व्यक्तीचे नाव देण्याचा हेतु विफल होतो. आपणास नम्र विनंती आहे की, रस्ता चौक विभाग गल्ली बोळ यांची अधिकृत नावेच वार्तांकनात देण्यात यावीत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकाचा वापर केल्याने हे सहज शक्य आहे.
 
विजय देवधर, पुणे
 
बेकायदा फलक काढा
 
राज्यात, शहरात कोठेही जा तुम्हाला बेकायदा फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यामुळे जीवितहानी, अपंगत्व, भांडणे, मारामार्‍या, वाद-विवाद हे नित्याचे झाले आहे. यावर ना राज्य सरकारचा, ना प्रशासनाचा अंकुश फक्त अनुचित प्रकार घडला की, तेवढ्यापुरते नियमावली करायची आणि काही दिवसांनी पहिला गोंधळ पुन्हा सुरू होतो. याबाबत कितीही जनजागृती केली, तरी हे प्रकार नित्याचे झाले आहेत. काही लोकप्रतिनिधींनी तर बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज सार्वजनिक ठिकाणी मतदार संघात न लावण्याचा प्रयत्न सुद्धा अयशस्वी झालेला आहे. नियम धाब्यावर बसवले जात आहेत. फक्त गवगवा करायचा आणि पहिला पाढा पुन्हा सुरू असा प्रकार सर्रास सुरू झाला आहे.
 
अनिल अगावणे, पुणे.
 
पर्यटनास जाताना सावधान
 
दैनंदिन कामाच्या व्यापातून एक विरंगुळा, विसावा म्हणून अनेकजण वर्षासहलीचे आयोजन करतात. निसर्गाच्या सानिध्यात त्यांची मुक्तपणे उधळण करुन मज्जा लुटायची या अनुषंगाने गड, किल्ले, दर्‍याखोर्‍या, समुद्राची सफर, सनसेट पॉईंट, धबधबे, प्राणी संग्रहालय, बंधारे, देवदेवतांची मंदिरे पाहण्यासाठी सहलींचा बेत आखला जातो; मात्र या सर्व धामधुमीत बेभान होऊन पर्यटक नको ते पर्याय निवडतात. धाडशी कृत्य करण्यास परावृत्त होतात; पण त्याची किंमत मोजावी लागते. विविध बंधार्‍यात, नदीत, धबधब्यात पोहायला गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू पावल्याच्या घटना काळीज पिळवटून टाकणार्‍या आहेत. सद्या मोठ्या पावसाला सुरुवात झाली नसली तरी अशा घटनांचा जोर मात्र धरु लागल्याचे दिसून येते आहे. 
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव

Related Articles