काढणीला आलेली बाजरी पावसामुळे भुईसपाट   

शेतर्‍यांची नुकसान भरपाईची मागणी

मंचर, (प्रतिनिधी) : मागील दहा ते बारा दिवसापासून सर्वत्र मान्सून पूर्व वळवाचा अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका अनेक शेतकर्‍यांना बसला आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक गावातील बाजरी उत्पादक शेतकर्‍यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. काढणीला आलेले बाजरी पावसामुळे भुईसपाट झाली असल्याचे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकर्‍यांना काही ना काही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
 
गेल्या दहा ते बारा दिवस पाऊस पडत असल्याने बाजरीचे पिक पावसात भिजत असल्याने या बाजरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. ही बाजरी काळी पडणार आहे. त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी बाजरीची चवसुद्धा कडु होणार असल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उन्हाळ बाजरीचे पिक घेतले जाते. ही बाजरी मे महिन्यात काढण्यासाठी येत असते. मे महिन्यात बाजरी काढत असताना या बाजरीला पाऊस लागत नाही. त्यामुळे बाजरीचे धान्य हे चांगले होत असते. बाजरीच्या भाकरीला सुद्धा चव असते. तसेच या बाजरीच्या सरमाडाचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून केला जातो. कारण उन्हाळ्यात काढलेल्या बाजरीचे सरमाड उन्हात वाळून चांगल्या स्वरूपात साठवणूक करता येते. अनेक शेतकरी चांगले उत्पादन देणारी उन्हाळ बाजरी करत असतो. याही वर्षी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर बाजरीचे पीक घेतले होते. पण ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर व हा पाऊस सतत सुरू असल्याने बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 
 
शेतात उभी असलेली काढणी योग्य बाजरी भुईसपाट झाली आहे. बाजरी खाली पडल्याने या बाजरीची कणसे मातीला टेकल्याने बाजरीचे धान्यही खराब झाले आहे. बाजरीच्या दाण्याचा रंगही काळा पडणारा असून बाजरीची चवही कडू होणार आहे. तसेच सरमाडही वाय जाणार असल्याने शेतकर्‍यांना या सरमाडाचा उपयोगही जनावरांचा चारा म्हणून करता येणार नाही. एकंदरीतच सध्या सुरू असलेल्या पाऊस उघडल्यानंतर ही बाजरी काढली तरीही या बाजरीला चांगल्या स्वरूपाचा भाव मिळणार नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. बाजरीच्या संदर्भात शेतकर्‍यांना काही ना काही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Related Articles