कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर   

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्गांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. आता सक्रिय रुग्णांची संख्या मंगळवारी चार हजारांवर पोहोचली आहे. केरळात सर्वाधिक रुग्ण असून त्या पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने काल आकडेवारी जाहीर केली. गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार २६ झाली. जानेवारीपासून ३७ जणांचा मृत्यू झाला. मे २२ मध्ये २५७ रुग्ण होते. आता ३१ मे पर्यंत संख्या ३ हजार ३९५ झाली. यानंतर संख्या वाढत जात ती ४ हजार २६ वर पोहोचली आहे. 
 
केरळात १ हजार ४४६ रुग्ण असून त्या पाठोपाठ महाराष्ट्रात ५९५, गुजरात ३९७ आणि दिल्लीत ३९३ रुग्ण आहेत. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला. 
 
अधिकार्‍यांनी सांगितले की, ३१ मे पासून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. संसर्गाची तीव्रता कमी आहे. अनेक जणांवर घरातच उपचार सुरू आहेत. काळजीचे कारण नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, पश्चिम आणि दक्षिण भागातून जनुकीय अनुकमासाठी नमुने गोळा केले. त्यात विषाणूच्या उपप्रकारामुळे रुग्ण वाढत आहेत. एलएफ ७, एक्सएफजी, जेएन.१ आणि एनबी १.८.१ असे विषाणूचे उपप्रकार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन विषाणूंच्या उपप्रकारातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण, काळजी करण्याची काहीही गरज नाही, असे डॉ. बहल यांनी सांगितले.
 

Related Articles