गोष्टी, कवितांमधून रंगला लेखकांशी संवाद   

पुणे : मुलांना कविता म्हणून दाखवत, गोष्टी सांगत, जुन्या आठवणींना उजाळा देतानाच लेखकांचा संवाद रंगला. लेखकांनी त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा सांगितल्या, तसेच मुलांना भरपूर वाचन करण्याचे आवाहन केले. तसेच पुणे बालपुस्तक जत्रा या संकल्पनेचेही कौतुक केले.राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेत लेखक तुमच्या भेटीला हे सत्र झाले. त्यात साहित्यिक एकनाथ आव्हाड, संगीता बर्वे, ल. म. कडू यांनी सहभाग घेतला. 
 
कावळ्याने खाल्या शेवया ही गोष्ट आणि कविता सादर करत आव्हाड म्हणाले, माझे शिक्षण मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. शाळेत असताना वाचनाची आवड लागली. त्यातून कथानकथन करू लागलो. त्यानंतर ठरवून शिक्षक झालो. शाळेत मुलांना गोष्टी सांगू लागलो, कविता म्हणून दाखवू लागलो. त्यामुळे मुलेही मोकळी झाली. माझ्या कथा-कवितांचे विषय मुलांकडूनच मिळतात. बालसाहित्याविषयी अजूनही अनास्था आहे. आजची मुले ज्या बदलत्या वातावरणात वाढत आहेत, त्यांचे भावविश्व साहित्यात येणे महत्त्वाचे आहे. मुलांना बालसाहित्याशी जोडणे, मुलांमध्ये वाचनाची प्रक्रिया रुजवण्यासाठी बालपुस्तक जत्रा महत्त्वाची आहे. 
 
संगीता बर्वे यांनी मुलांना सोबत घेऊन ’वाचा हो वाचा पुस्तक’, ’झाड आजोबा,’ ’खारुताई आणि सावलीबाई’ अशा कविता सादर केल्या. त्या म्हणाल्या, माझे लेखन लहान असतानात सुरू झाले. मी चौथीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली होती. लहानपणी वाचलेले, ऐकलेले दीर्घकाळ लक्षात राहते. मात्र कार्टून पाहण्यात केवळ वेळ जातो. त्यामुळे भरपूर वाचन केले पाहिजे.ल. म. कडू यांनी त्यांच्या खारीचा वाटा या कादंबरीविषयी, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ’मुलांसाठी काही करण्यासाठी आधी पालकांचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. अंध मुलांंनी वाचण्यासाठी त्यांना ब्रेल लिपीत पुस्तके उपलब्ध केली आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

Related Articles