वस्त्र हे संस्कृतीचे द्योतक : प्रा. जोशी   

पुणे : वस्त्रांचा उपयोग अगदी सुरूवातीपासून केवळ लज्जा रक्षणासाठी केला जात नसून वस्त्र हे समकालीन संस्कृतीचे द्योतक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 
 
डॉ. नलिनी गुजराथी आणि मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा कै. कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्कार विनय नारकर लिखित ’वस्त्रगाथा’ या पुस्तकास गुरुवारी ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. जोशी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मोहन गुजराथी, डॉ. नलिनी गुजराथी, लेखक  विनय नारकर, मसाप, पुणेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते. 
 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, भाषा आणि वस्त्र परंपरा यांना सामाजिक संस्थेचा दर्जा असून या दोन्ही घटकांव्दारे सामाजिक स्तरांचा अभ्यास करता येतो. ज्या प्रमाणे लोकगीतांचा अभ्यास हा लोक संस्कृतीचा अभ्यास असतो, त्याच प्रमाणे कोणत्याही वस्त्र संस्कृतीचा अभ्यास हा वस्त्र आणि मानव यांच्यातील परस्पर अनुबंधांचा अभ्यास असतो. प्रसंगानुरूप भाषेचा वापर केला जातो, तसेच प्रसंगानुरूप वस्त्रांचा देखील वापर केला जातो. भाषा आणि वस्त्र संस्कृतीमध्ये मानवी उत्थान आणि प्रगतीच्या टप्प्यांची पाळेमुळे रूजलेली आहेत. 
 
या अर्थाने वस्त्र आणि मानवी जीवन यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. मानवी संस्कृतीच्या ओघात अनेक प्रवाह काळाच्या कसोटीवर टिकले आणि नामशेष झाले. मात्र, वस्त्र संस्कृतीच्या बाबतीत प्रारंभापासूनच मनुष्याला उत्सुकता असल्याचे दिसून येते. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले, भारतीय वस्त्र परंपरा ही खूप दीर्घ आणि समृध्द आहे.पैठणीसारख्या वस्त्राचे पडदे किंवा उशांचे आभ्रे न तयार करता आपल्या समृध्द वस्त्र परंपरेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. यावेळी प्रा. वर्षा तोडमल यांनी परिक्षक म्हणून मनोगत व्यक्त केले. डॉ. नलिनी गुजराथी यांनी कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर यांनी ग्रंथालय क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल विस्ताराने माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मसाप, पुणेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. मसापच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

Related Articles